पुणे : देशातील लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेली प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट आज गंजलेली आहे. तिच्यातील दोष दूर करून काही आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे ‘प्रशासकीय योगायोग’ आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी लिहिलेल्या ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ या पुस्तकांचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. याप्रसंगी जीएसटी पुणेच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे, सेवानिवृत्त अधिकारी सत्यजित गुजर, निवृत्त अधिकारी चिंतामणी जोशी, सेवानिवृत्त अधिकारी रंगनाथ नाईकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, प्रशासकीय व्यवस्था पुन्हा बळकट कशी होईल आणि देशातील लोकशाहीचे खांब असणाऱ्या तिन्ही व्यवस्था मध्ये संतुलन कसे निर्माण होईल हे पाहणे गरजेचे आहे. कठोर प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडणे ही काळाची गरज आहे.
तसेच यशदा सारख्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला जावा आणि तिथून उत्तमोत्तम संशोधन होऊन चांगले अधिकारी बाहेर पडावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना उल्हास पवार यांनी अनेकानेक किस्से सांगून धमाल उडवून दिली. ते म्हणाले, विसंगतीतून विनोद निर्माण होतो. प्रशासनात अनावधानाने बऱ्याच गडबडी होतात. त्यातूनच लेखनासाठी उत्तम संधी तयार होते.
ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर म्हणाले, प्रशासकीय व्यवस्थेत कागद नीट वाचले जात नाहीत. ते झाले तर अनेक प्रश्न सुटतील आणि सुप्रशासनाकडे वाटचाल होईल.
जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे म्हणाल्या, या दोन्ही पुस्तकातून प्रशासनाची बाजू समोर यायला नक्कीच मदत होईल. मराठी साहित्यात लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांची मांदियाळी मोठी आहे. डोळसपण लाभलेल्या अधिकाऱ्यांचे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.
रत्नाकर गायकवाड म्हणाले, “आजच्या खालावत चाललेल्या प्रशासनाला विनोदाची झालर मिळावी म्हणून या पुस्तकाचे लेखन मी केले आहे. प्रशासनातील अनेकानेक गंमतीशीर किस्से उलगडताना निखळ करमणूक करण्याच्या हेतूने लेखन केले आहे. सनदी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव लिहिते केले तर मराठी साहित्यात मोलाची भर पडेल.
लेखक राजीव नंदकर म्हणाले, गेली 20 वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना आलेले विविध अनुभव आणि काम करताना बाळगलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रशासन ते सुप्रशासन हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.
मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक आशिष पाटकर आणि अनुराध्या प्रकाशनाच्या प्रकाशक चेतना नंदकर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक आणि आभार प्रल्हाद कचरे यांनी मानले. उपस्थित आजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक किस्से सांगून धमाल उडवून दिली.
चौकट
*पक्षांतरबंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत फेकावा*
पक्षांतरबंदी कायदा हा निरर्थक ठरलेला असून तो कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यावा आणि त्या जागी नवे काही आणावे अशी गरज निर्माण झालेली आहे. आज एकूणच लोकशाही धोक्यात आलेली असून तीच टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.


