पुणे : बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाऊबीजेचे आयोजन केले. महिलांच्या हातात बांगड्या भरल्या गेल्या आणि त्यांना साडी चोळी दिली त्यावेळी माहेरी आल्याची भावना त्यांच्या मनात दाटून आली. त्यामुळे महिलांनी देखील काही काळ आपला संघर्ष विसरत मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी केली. यावेळी गणेशोत्सव मंडळे आणि विविध सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आदराने आणि प्रेमाने महिला भारावून गेल्या.
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे, वंचित विकास संस्था, विधायक, पुणे आणि सार्वजनिक सभेच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठेतील देवदासी महिलांची भाऊबीज साजरी करण्यात आली. बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, जनता सहकारी बँकेच्या संचालिका पद्मजा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आदी यावेळी उपस्थित होते. शेखर कोरडे, वंचित विकास संस्थेच्या मीनाक्षी नवले, सुरेश कालेकर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, रांगोळीकार संदीप ढवळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमास विविध गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अविनाश भोंडवे म्हणाले, निसर्गाने माणूस एकच बनवला आहे परंतु आपण माणसेच एकमेकांमध्ये भेदभाव करतो. देवदासी महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांनादेखील ताठ मानेने राहण्यासाठी कार्यकर्ते मदत करत आहेत हे कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, देवदासी महिला या दिवसाची वाट आतुरतेने बघत असतात. भाऊबीजेचा हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. यादिवशी महिलांना साडी चोळी, मिठाई आणि पुष्प देऊन स्वागत केले जाते. संस्थेत आल्यावर बांगड्या भरल्या जातात तेव्हा या महिलांना माहेरी आल्याच्या भावना मनात दाटून येतात. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी आभार मानले.
—


