पुणे, दि. २६ – सध्याच्या धकाधकीच्या काळात पालक व पाल्य यांतील सुसंवाद कमी होत चालला आहे आणि त्यामुळे पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यासाठी रामचंद्र जोशी यांनी लिहिलेले “समंजस पालकत्व” हे पुस्तक यावर उपयोगी ठरू शकेल, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षण सहसंचालक म. वि. बोंडे यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केले. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. प्रशांत महाराज देहूकर, लेखक जोशी, एकविरा प्रकाशनचे सुहास कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोंडे पुढे म्हणाले की, विविध संतांची वचनांचा उपयोग करुन पाल्यांना संस्कार शिकवण्याची गरज आहे, मात्र शिकवताना आपल्यातील पालक दूर ठेवला पाहिजे. समस्या सोडवण्यासाठी पाल्यांबरोबर मैत्री करावी लागेल.
पुस्तकाचे लेखक रामचंद्र जोशी यांनी पुस्तकामागची संकल्पना सांगितली. एकवीरा प्रकाशनच्या वतीने सुहास कुलकर्णी यांनी प्रकाशक व लेखक यांच्या संबंधांबाबत आणि या पुस्तकाची उपयुक्तता यावर भाष्य केले. कार्यक्रमात पुस्तकाला सहाय्यभूत झालेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका जोशी यांनी आभार मानले.
—————————-
🙏


