पुणे, दि. ३० जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे २०२४ चा दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ आयआयएम, बेंगरुलूचे माजी संचालक व नॅशनल रेल अॅण्ड ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूटचे प्रा.जी. रघुराम, मॅगॅसेसे पुरस्कार विजेते व सुप्रसिध्द जलसंरक्षक डॉ. राजेंद्र सिंह, सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती व बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सेफ वॉटर अॅण्ड सॅनिटेशन विभागाचे प्राध्यापक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.
पुरस्काराचे हे २०वे वर्ष आहे. प्रत्येकी सव्वा लाख रूपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा समारंभ शनिवार, दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभामंडप येथे विख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पायभूत सुविधा, वाहतुक व्यवस्था, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन यांच्यातील आव्हाने हाताळण्यात विशेष यश संपादन केल्याबद्दल प्रा. जी रघुराम यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ८६०० तलावांची निर्मीती, राजस्थानातील ५ नद्यांचे पुनरुज्जीवन व जलसंधारण कार्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह व शास्त्रीय संगीतातून सार्वजनिक प्रबोधन कार्याबद्दल कौशिकी चक्रवर्ती यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ने गौरविण्यात येईल. त्याच प्रमाणे उष्णता हस्तांतरण द्रव गतिशीलता आणि विकासासाठी तंत्रज्ञान डिझाईन या क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्याबद्दल वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक गाडगीळ यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी आपल्या देशाच्या नाव लौकिकात भर टाकली. विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्काराची योजना आहे.
भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे.
‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२४’
पुरस्कारार्थीचा संक्षिप्त परिचय
१: ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार ’२०२४
प्रा.जी. रघुराम ः हे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ असून पायभूत सुविधा, वाहतुक व्यवस्था, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन इ. क्षेत्रामध्ये संशोधन करून सर्वसामान्यांचे जीवन उंचाविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानाचा प्रसार केला आहे. नियोजन आयोग, विविध सरकारी धोरणे आणि सल्लागार समित्यांमध्ये कार्य केले आहे.
२: ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ २०२४
१: राजेंद्र सिंहः जलसंधारण आणि पर्यावरणासाठी आयुष्य वेचणारे डॉ. राजेंद्र सिंह यांना वॉटर मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांनी सरिस्का व्याघ्र प्रकल्पाजवळील होरी भिकमपुरा, नोकरशाही विरूद्ध लढाई लढली. पाण्याचे महत्व समजावून सांगत गावकर्याना त्यांच्या अर्ध शुष्क भागात पाणी व्यवस्थापानाची जवाबदारी घेण्यास सक्षम बनविले. त्यांनी राजस्थानातील कित्येक नदयांचे पुनरूज्जीवन केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मॅगॅसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
२: श्रीमती कौशिकी चक्रवर्तीः वयाच्या १०व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरविणार्या कौशिकी ने शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे. त्या पटियाला घराण्याच्या गायिका आहेत. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत व लोकप्रिय संगीत अशा विविध शैलीत गायन करून लोकजागृतीचे कार्य करीत आहेत.
३: ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ २०२४
डॉ. अशोक गाडगीळः उष्णता हस्तांतरण द्रव गतिशीलता आणि विकासासाठी तंत्रज्ञान डिझाईनच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. कार्यक्षमता आणि त्याच्या अंमलबजावणीवर तांत्रिक, आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला तेजस्वी व शाश्वत आकार देण्यासाठी त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी यूव्ही वॉटरवर्क्स, बर्कले डार्फर स्टोव्ह व इकार यांचे संशोधन करून समस्येचे निराकरण केले आहे.


