पुणे, दि.३० जानेवारी:“महात्मा गांधी या शब्दातच शक्ती आहे. दया, करुणा व प्रेमाचे ते शांती दूत होते. ती एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांच्यावर जगातील १ लाखापेक्षा अधिक विचारवंतांनी पुस्तकांचे लिखाण करूण विश्व शांतीचा संदेश पोहचविला आहे.”असे विचार उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७६ व्या पुण्यतिथी निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड होते.
यावेळी मंचावर हिंदी साहित्यक आचार्य रतनलाल सोनग्रा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ, संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व डॉ. पबशेट्टी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी प्रतिनिधि उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले,“१४३ देशात म. गांधीजींचे पुतळे उभारून विश्वशांतीचा संदेश दिला जात आहे. त्यांच्या कार्याला पाहून युनोने २ ऑक्टोंबरला अहिंसा दिवस म्हणून घोषित केल आहे. वर्तमान काळात नव्या पिढीने गांधीजींना समजून घेणे आवश्यक आहे. एमआयटीत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकला ते विश्वशांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ म. गांधीजींनी सतत आत्मपरीक्षण केले आहे. आज त्यांचा हा विचार आपल्या जीवनात उतरविणे गरजेचे आहे. शेवटच्या क्षणी त्यांच्या मुखातून हे राम, हे राम, हे राम या शब्दांचा उच्चार होता यावरून ते पुण्यात्मा आहेत. गांधीजीच्या तत्वांवर विचार करण्याची वेळ आली आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, परंपरा आणि वसुधैव कुटुम्बकम चा संदेश संपूर्ण जगाला पोहचवायचा आहे.”
रतनलाल सोनग्रा म्हणाले,“म. गांधी यांनी समाजाला हिम्मत देऊन एकसंघ बांधले. अहिंसेचा नवा नारा देऊन देशाची भाषा बदलवली. सत्य अहिंसा आणि मानवता ही सर्वात मोठी शक्ती आहे त्यांनी आपल्या आचरणातून दाखविले.”
डॉ. एस.एम.पठाण म्हणाले,“खेड्यांकडे चला हा दिलेला नारा सर्वात सशक्त होता. तसेच त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशी जागृती निर्मिती केली आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ गांधीजीची विचारधारा पुढे नेण्यासाठी नव्या पिढीला समोर यावे लागणार आहे. त्यासाठी स्वत्व जागृत ठेवावे लागणार आहे. एखादा मनुष्य जेव्हा वैश्विक विचार करतो तेव्हा व्यक्ति, कुटुुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या गोष्टीमध्ये खूप फरक पडतो.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना मांडली.
यावेळी विद्यार्थी शौनक पाटील, ओम जोशी, अदिती शर्मा, अर्थव रासकर, पियूष पाटील आणि ज्ञानेश्वरी यांनी गांंधीजीच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त करून त्यांच्या तत्वांना जीवनात उतरवावे असे सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. प्रा.पबशेट्टी यांनी आभार मानले.


