पुणे : सुमधुर संगीत, गायकांचे अप्रतिम सादरीकरण, वादकांची चपखल साथ संगत आणि जोडीला रसिकांची दिलखुलास दाद, अशा सुर आणि संगीताने नटलेल्या वातावरणात ‘दिल ने ये कहा है दिल से’ हा कार्यक्रम रंगला.
स्वच्छंद पुणे प्रस्तुत आणि ईगल इन्फ्रा ग्रुप यांच्या सहकार्याने ‘दिल ने ये कहा है दिल से’ हा नव्या आणि जुन्या बहारदार हिंदी आणि मराठी संगीत गीतांचा कार्यक्रम कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रंगला. या कार्यक्रमांमध्ये कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे रसिक हिंदी संगीताच्या सुवर्ण युगामध्ये हरवले.
पल्लवी आनदेव यांनी ‘ये समा समा है ये प्यार का’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर रवींद्र शाळू यांनी ‘और इस दिल में क्या रखा है’ हे गाणे सादर केले तसेच त्यानंतर संजय कांबळे यांनी ‘मैं शायर तो नही’ या गाण्याच्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली.
‘चांद सिफारिश जो करता तुम्हारी’, ‘जादू तेरी नजर’, ‘दिल ने ये कहा है दिल से’, ‘करवटे बदलते रहे’, ‘सुरज हुआ मद्धम’, ‘दिवाने है दिवानो को ना घर चाहिये’, ‘गाता रहे मेरा दिल’ अशा नवीन आणि जुन्या बहारदार हिंदी गीत संगीत सादर करून कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पल्लवी आनदेव ,संजय कांबळे, मनोज सेठिया, रवींद्र शाळू यांच्यासह कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेल्या मुंबईतील कलाकार व्हाईस ऑफ लतादीदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता सातार्डेकर यांनी अप्रतिम गाणी सादर केली. प्राजक्ता सातार्डेकर यांनी गायलेल्या मोसे छल किये जा, रंगीला रे या गाण्यांना विशेष दाद मिळाली. प्राजक्ता श्रावणे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यश भंडारे यांनी संगीत संयोजन केले. केदार परांजपे, शैलेश देशपांडे, नागेश भोसेकर ,आसिफ इनामदार, रोहित जाधव या सर्व वादक कलाकारांनी आपल्या वादनातून रसिकांना भारावून टाकले.
—


