Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीवन सुंदर करण्यासाठी अंतर्मनात डोकावण्याची सवय लावा : गणेश शिंदे 'कॉक्लिआ...

जीवन सुंदर करण्यासाठी अंतर्मनात डोकावण्याची सवय लावा : गणेश शिंदे ‘कॉक्लिआ पुणे’ या संस्थेस “जनसेवा पुरस्कार २०२५” प्रदान

पुणे, दि. २ : ” कायम दुसऱ्याशी तुलना करून माणूस स्वतःला दुःखी करून घेत असतो. जगण जर सुंदर करायाचे असेल तर बाह्य जगात बघण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात बघण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सांगितले.

जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणेच्या ५३व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर शिंदे बोलत होते.

बँकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘जनसेवा पुरस्कार २०२५’ कर्ण-बधिर मुलांना बोलते करण्यासाठी झटणारी “कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच” या संस्थेस प्रदान करण्यात आला. रक्कम रु.१,०१,०००/- ( एक लाख एक हजार रुपये), मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या वर्धापन दिनापासून मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सेवकांना गुणवंत सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिला गुणवंत सेवक पुरस्कार श्री अमित गायकवाड आणि सौ आरती भारती यांना प्रदान करण्यात आला.

 

हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात झालेल्या वर्धापन दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष रवि तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर, कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच या संस्थेचे मुख्य व्यवसाथपकीय विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, विश्वस्त सौ. रक्षा देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

आपल्या शैलीदार बोलण्यातून जीवनाची सुंदरता उलगडताना शिंदे म्हणाले, ” भौतिक साधनांनी माणसाचे आयुष्य सोपे, सुलभ होईल, पण सुखी होईलच असे नाही. प्रत्येक व्यक्तिने आपली प्रगती ही समाधानाच्या पातळीवर मोजली पाहिजे. आनंद ही अंर्तमनाची अवस्था आहे. जीवन सुखी करायाचे असेल आणि सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रेम आणि वात्सल्याची भावना जपली पाहिजे. माणसाने माणसामध्ये देव बघायला शिकले पाहिजे. तसेच प्रत्येकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाशी जुळवूण घेतले तरच माणसाचे जीवन सुखमय होईल. ”

 

डॉ दबडघाव म्हणाले, ” जनसेवा बँक जशी आर्थिक बाबतीत अग्रेसर आहे. तसेच आपण या समाजाचे देणे लागतो, या भूमिकेतून राष्ट्रीय व सामाजिक कार्यात आणि सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कायमच मदत करण्यात बँक अग्रेसर असते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष पोळेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच बँकेचे अध्यक्ष डॉ. हिरेमठ यांनी बँकेच्या वर्षभरातील आर्थिक कामगिरीवर प्रकाश टाकला.

 

पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना डॉ. वाचासुंदर म्हणाले, ” जनसेवा बँकेतर्फे मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आम्ही समाजात करीत असलेल्या कार्याची दखल समाज घेत असल्याची पावती आहे. हा पुरस्कार हा आमच्या साठी खरोखरीच प्रेरणादायी असून, आगामी काळात कर्ण बधिर बालकांचे आयुष्य सुकर करण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करू. ”

 

श्री. सुहास शामगावकर यांनी स्वागत गीत सादर केले. श्री. अभिजित केळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सौ. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष श्री. रवि तुपे यांनी आभार मानले. पसायदानाने समारंभाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments