पुणे, दि. 26 नोव्हेंबर- राष्ट्रकार्यासाठी गेली 100 वर्षे अखंडपणे कार्य करणार्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल सर्व समाजाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या सोमवारी (1 डिसेंबर) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे दिली. येत्या सोमवारी सायं. 6 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे होणार्या. या सोहळ्याला कांचीपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे आशीर्वचन लाभणार आहे.
यावेळी बोलतांना अभ्यंकर म्हणाले की, 1925 पासून आजपर्यंत असंख्य संघ प्रचारक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी या राष्ट्रासाठी आपले सर्वस्व समर्पित केले आहे. राष्ट्रकार्यात अनेक स्वयंसेवकांनी बलिदान देखील दिले आहे. अशा सर्वांबद्दलच कृतज्ञता व्यक्त करणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. संघशताब्दीच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे, याचा आनंद वाटतो. समाजातील चांगल्या आणि सकारात्मक बाबींचा, उपक्रमांचा आणि ध्येयनिष्ठ व्यक्तींचा गौरव करण्याचे काम आदित्य प्रतिष्ठान 1983 पासून करीत आहे. लोकशिक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन ही प्रतिष्ठानचे प्रमुख उद्दीष्टे आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने अनेकविध धार्मिक आणि वैचारिक विषयांवरील ग्रंथांची निर्मिती देखील सातत्याने केली जात असते. 2009 पासून प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मी वासुदेव पुरस्कार प्रदान केले जातात. भारतरत्न लता मंगेशकर, भीमसेन जोशी, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, डॉ. प्रकाश व मंदा आमटे अशा अनेक प्रभृतींना या पुरस्काराने गौरविले आहे. लोणावळ्याजवळ मावळ तालुक्यात सुमारे 33 एकर जागेत भव्य वैश्विरक संत भारती उभी राहत आहे, ज्यामध्ये संतांचे अधिष्ठान असलेले विद्यापीठ व सांस्कृतिक, आध्यात्मिक नगरी असेल. समाजाने यामध्ये दानाच्या द्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानने करीत आहे.


