पुणे, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५: भारतीय संविधानातील वैश्विक मानवी मूल्ये हे आपल्या संस्कृतीचे संचित आहे. संविधान केवळ एक कायद्याचा दस्तऐवज नसून, भारताच्या राष्ट्रजीवनाचे तत्त्वज्ञान आहे, असे मत लेखक आणि अभ्यासक अभिजित जोग यांनी व्यक्त केले.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर, विश्व संवाद केंद्राच्या सहयोगातून कमिन्स कॉलेज ऑफ अभियांत्रिकी फॉर वूमन येथे आयोजित ‘संविधान पहाट’ कार्यक्रमात अभिजित जोग बोलत होते. यावेळी विभागप्रमुख प्रा. माधुरी पुरंदरे, विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते. भारतीय संविधान केवळ राज्याची कार्यपद्धती निश्चित करत नाही, तर राष्ट्र म्हणून आपल्या मूल्यांचाही जागर करते, असे परखड मत जोग यांनी मांडले. ते म्हणाले, “भारतीय धर्मांत उपासना पद्धतीचे स्वातंत्र्य आहे. तेच तुम्हाला स्वतःच्या ज्ञानमार्गाचीही निवड करण्याचीही मुभा देते. संविधानात विचार आणि भाषण स्वातंत्र्याच्या मार्गदर्शक तत्त्वांत याची परिणती दिसते. ‘वसुधैव कुटुंबकम्’चा विचार असलेली ही संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णुतेचा वस्तुपाठ शिकवते. प्राचीन भारतातील महाजनपदे आजच्या संविधानिक लोकशाही गणराज्याची पूर्वज आहेत. सदाचार आणि नैतिकतेचा वस्तुपाठच भारतीय धर्मांत असून, या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या संविधानात दिसते.” जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी सर्वोत्तम संविधान म्हणजे भारताचे संविधान होय, असेही जोग म्हणाले.
‘संविधान पहाट’ कार्यक्रमाची भूमिका नितीन देशपांडे यांनी मांडली. ते म्हणाले, “आपल्या परंपरेचे मूल्य म्हणजे संविधान होय. त्यामुळे तो आपल्या जगण्याचा मंत्र असून, संविधान दिनी त्यातील मूल्यांचा जागर करणे गरजेचे आहे. संविधानिक मूल्ये अधिकाधिक आत्मसात करणे हीच संविधान निर्मात्यांना आदरांजली ठरेल.” आरोही अग्रवाल या विद्यार्थिनीने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. सिद्धी जोशी हिने आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली कुमावत यांनी केले. संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
———–
– ‘जेन झी’ मध्ये असंतोषाचा प्रयत्न
भारतीय संविधानाने स्वातंत्र्य आणि संधीची समानता दिली आहे. मात्र, समान परिणामांबद्दल (आउटकम) सांगितलेले नाही; कारण शास्त्रीयदृष्ट्या ते शक्यच नाही. मात्र ‘जेन-झी’ जनरेशनमध्ये समान परिणामांच्या नावाखाली गैरसमज निर्माण करत त्यांच्यामध्ये नाराजी आणि असंतोष पसरवला जात आहे, असे परखड मत अभिजित जोग यांनी व्यक्त केले. समान परिणाम हे व्यक्तीच्या क्षमता आणि विकासावर अवलंबून आहे. मात्र समान संधी हे राज्यसंस्थेचे दायित्व आहे, असेही ते म्हणाले.
———


