भारतीय नेमबाजी क्षेत्रासाठी नजीकच्या भविष्यात तंत्रज्ञान, आश्वासक खेळाडूंची योग्य ओळख आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोच वाढविण्याला देणार प्राधान्य
पुणे, ४ डिसेंबर २०२५: भारतातील प्रतिष्ठीत नेमबाजी प्रशासक आणि तांत्रिक तज्ज्ञांपैकी एक असलेल्या पवन सिंह यांची राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एनआरएआयच्या महासचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवारी मोहाली येथे झालेल्या निवडणुकांमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली. पवन सिंह यांच्या या निवडीमुळे भारतीय नेमबाजीच्या नेतृत्वात स्पर्धात्मक अनुभव, प्रशिक्षण उत्कृष्टता आणि जागतिक स्तरावरील कामगिरीचे मिश्रण नजीकच्या भविष्यात पहायला मिळेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. सिंह यांच्या निवडीबरोबरच, एनआरएआय नेतृत्व अधिक मजबूत झाले असून कलिकेश नारायण सिंह देव यांची एनआरएआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
पवन सिंह यांनी १९९५ मध्ये त्यांच्या नेमबाजीच्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर २००७ ते २०१२ पर्यंत नेमबाजीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) च्या पंच अर्थात जजेसच्या समितीवर निवडून आलेले पहिले भारतीय बनून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान आणखी उंचावले, ऑलिंपिक खेळांसह प्रमुख जागतिक स्पर्धांमध्ये देखील पंच समितीवर सदस्य म्हणून पवन सिंह यांनी काम केले. नेमबाजी खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या गन फॉर ग्लोरी या संस्थेचे ते सह-संस्थापक आहेत. पुण्यातील म्हाळुंगे – बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे सादर नेमबाजी प्रशिक्षण संस्था कार्यरत असून गेल्या १ दशकाहून अधिक काळ देशासाठी उत्तम नेमबाज घडवत आहे. पवन सिंह हे पुण्याचे रहिवासी आहेत.
भारताच्या नेमबाजी क्षेत्रातील प्रतिभेच्या प्रवाहाला बळकटी देण्यासाठी तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआयचा) वापर करणे ही माझी प्राथमिकता आहे, असे सांगत एनआरएआयच्या महासचिवपदाच्या बिनविरोध झालेल्या निवडीनंतर भविष्यातील योजनांबद्दल बोलताना सिंह म्हणाले की, “एनआरएआयमधील नोंदणीपासून ते निकालांपर्यंत अशी सर्वच कामे ही आधीच ऑनलाइन असून नजीकच्या काळात तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्यावर माझा भर असणार आहे. याबरोबरच देशभरातील प्रतिभावान नेमबाजांना ओळखण्यासाठी आम्हाला एआय आणि खेळाडूंच्या परफॉर्मन्स डेटाचा वापरही करायचा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील आश्वासक खेळाडूंना शोधण्यासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर माझे विशेष लक्ष असेल. आम्ही प्रशिक्षक आणि नेमबाजांना देखील प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित करू इच्छितो जेणेकरून निवृत्तीनंतर त्यांना पर्यायी कारकीर्द घडविता येऊन त्यातून आपला योग्य पद्धतीने उदरनिर्वाह करणे शक्य होऊ शकेल.
नेमबाजी या खेळाची व्याप्ती वाढवायची असेल तर भारताची नेमबाजी क्षेत्रातील कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत असताना, देशांतर्गत परिसंस्थेचे प्रमाण व समावेशकता वाढायला हवी, असा एक व्यापक दृष्टीकोन सिंह यांनी मांडला. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, “आपला नेमबाजीचा खेळ सर्वोत्तम कामगिरी करत असून आता तो अधिक लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने आम्ही नजीकच्या भविष्यात प्रयत्न करू. याद्वारे या खेळातील अधिकाधिक प्रतिभाशाली खेळाडूंशी आम्ही जोडले जाऊ आणि खेळाडूंना देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासामध्ये याची मदत होईल.”
सिंह पुढे म्हणाले की, पुन्हा एकदा तरुण खेळाडूंचा या प्रणालीत प्रवेश झाल्यानंतर, एनआरएआय हे संरचित विकास आणि पाठिंब्याच्या बळावर त्यांच्यावर आपले लक्ष केंद्रित करेल. “यानंतर यशस्वी खेळाडूंचे संगोपन करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असून यासाठी आम्ही सीएसआर निधी आणि प्रायोजकत्वासाठी देखील प्रयत्न करू. याद्वारे खेळाडूंना अधिक पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न अधोरेखित होईलच शिवाय ते देशासाठी खेळण्यास तयार होऊ शकतील.” त्यांच्या नजीकच्या भविष्यातील योजनांचा पुनरुच्चार करताना, सिंह यांनी स्पष्टता आणि उद्देशावर आपला असलेला भर यांकडे लक्ष वेधले. खेळाडूंची कामागिरी आणि लोकप्रियता हे आपले भविष्यातील प्रारंभिक लक्ष्य असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.
याबरोबरच लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता गगन नारंग, दुहेरी ऑलिंपियन इलावेनिल वलारिवन, झोरावर सिंग संधू आणि कुंती मलिक हे एनआरएआयच्या कार्यकारी समितीचे क्रीडा प्रतिनिधी म्हणून सामील झाले आहे
त हे विशेष.


