पुणे : कार्यकर्ता आणि सामजिक कार्य करणारे आता संपणार आहेत. पैसे नसणाऱ्यांकडे सामाजिक कार्य करताना अडचणी येत आहेत. पूर्वीसारखे नमस्कार करुन निवडणुका आता जिंकता येत नाही. पैशांशिवाय राजकारण करता येत नाही. त्यामुळे यापुढील काळात गोरगरीब चळवळीतला कार्यकर्ता राजकारणात दिसणार नाही. श्रीमंताची, घराणेशाही असणाऱ्यांची मुले आता यापुढील काळात राजकारणात दिसतील, असे मत माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस आणि सत्या फाउंडेशन यांच्यावतीने गरीब व गरजू लोकांना १२,००० कपड्यांचे वाटप करण्यात आले. नऱ्हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष साईनाथ बाबर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईबार, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, सत्या फाउंडेशनच्या अध्यक्ष गीतांजली जाधव आदी उपस्थित होते.
साईनाथ बाबर म्हणाले, आपण जाती- धर्मात अडकून राहिलो आहोत. विकासावर कोणी बोलत नाही. बरेचसे देश जातीपातीच्या पलीकडे गेले आहेत. आपला देश विकसित होऊन पुढे आला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
महेश भोईबार म्हणाले, शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रम राबविले तर मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतात. शिक्षणाचा व्यवसाय अनेक संस्थांनी केला आहे अशावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे होणारे समाजपयोगी उपक्रम स्तुत्य आहेत.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, आपल्या धर्मात वस्त्रदान हे श्रेष्ठ दान आहे, असे आपल्या धर्मात सांगितले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे झाली परंतु आजही अनेक लोकांना स्वच्छ धुतलेले कपडे घालायला मिळत नाही. केवळ चांगले कपडे घालायला न मिळाल्याने लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


