पुणे,4 फेब्रुवारी 2026 : ग्योथं इन्स्टिट्युट मॅक्सम्युलर भवन,पुणे तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) जर्मन भाषा विभागाच्या सहयोगाने जर्मन लेखक इंगो शुल्त्सं यांच्या दी रेश्टशाफेनेन म्योर्डर या लोकप्रिय कादंबरीचा अभिवाचन कार्यक्रम मॅक्सम्युलर भवन येथे आयोजित करण्यात आला होता.जर्मन आणि मराठीत अभिवाचन समाविष्ट असलेल्या या द्विभाषिक कार्यक्रमात या कादंबरीतील काही भागांवर प्रकाश टाकत समकालीन युरोपातील स्मृती,नैतिकता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी लेखक इंगो शुल्त्सं, एसपीपीयू येथील जर्मन भाषा विभागाच्या माजी प्रमुख स्वाती आचार्य,ग्योथं इन्स्टिट्युट मॅक्सम्युलर भवन,पुणे चे संचालक मार्कुस बिशेल आदी मान्यवर उपस्थित होते.वैशाली दाबके आणि प्रणव बापट यांनी या कादंबरीच्या काही भागांचे अभिवाचन मराठीत केले.तर इंगो शुल्त्सं यांनी जर्मनमध्ये अभिवाचन केले. अभिवाचन कार्यक्रमानंतर इंगो शुल्त्सं आणि स्वाती आचार्य यांच्यात संवादात्मक सत्र पार पडले.कार्यक्रमाची सुरूवात स्वरदा दातार आणि मिताली यांनी कादंबरीचा सारांश गायन व नृत्य प्रकारात मांडला.अस्मिता डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.
लेखक इंगो शुल्त्सं म्हणाले की,कुठल्याही कादंबरीला वाचक आणि विशेष करून तरूण कसा प्रतिसाद देतात हे त्या पुस्तकाच्या यशामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते.कादंबऱ्यांमध्ये इतिहासाची पार्श्वभूमी असते आणि तरूण वर्ग ते सध्याची परिस्थिती आणि त्यांच्या अनुभवानुसार संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करत असतात.
इंगो शुल्त्सं हे भारतीय भेटीवर असून त्यांचा असाच कार्यक्रम कॅलिकट मध्ये पार पडला. तेथे त्यांच्या कादंबरीचे भाषांतर मल्याळममध्ये करण्यात आले आहे.या कादंबरीचे मराठीत भाषांतर सुरू असून स्वाती आचार्य हे करत आहेत.स्वाती आचार्य या प्रतिष्ठित अशा जर्मन ॲकॅडमी फॉर लँग्वेज ॲन्ड पोएट्रीच्या पहिल्या भारतीय सदस्या आहेत.त्या म्हणाल्या की,भाषांतर हे देखील एक स्वतंत्र कार्य आहे.मूळ पुस्तक आणि त्याचे भाषांतरीत रूप हे दोन वेगवेगळ्या लेखकांचे मिळून एक स्वरूप आकाराला येते.ही कादंबरी सर्वप्रथम 1995 मध्ये प्रकाशित झाली होती.त्याचे मराठी भाषांतर यावर्षीच्या मे महिना अखेर तयार होईल,अशी अपेक्षा आहे.
इंगो शुल्त्सं यांनी लिहिलेली कादंबरी अतिशय रंजक आहे.नीतीमान मारेकरी असे या पुस्तकाच्या शीर्षकाचा अनुवाद आहे. या वरकरणी शीर्षकातच जाणवणारा विरोधाभास प्रत्यक्षात सर्व समाजामध्ये कसा अनुभवायला मिळत असतो,हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.स्वत:ला बुध्दिजीवी,पुस्तकप्रेमी इत्यादी समजणाऱ्या लोकांची ज्ञाननिष्ठा आयुष्याच्या कसोटीच्या प्रसंगांमध्ये केवळ वरवरची वाटावी अशी दांभिकता दिसते. 3 ऑक्टोबर 1990 रोजी अधिकृतरित्या जेव्हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे पुर्नएकीकरण झाले तेव्हा तत्कालीन पूर्व जर्मनीतील नागरिकांना अगणित वैचारिक,भावनिक,सामाजिक,भाषिक आणि आर्थिक बदलांना व आव्हानांना सामोरे जावे लागले,ही या कादंबरीची पार्श्वभूमी आ
हे.
—


