पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खालील प्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांच्या आकारमानाचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर केला. ‘विकसित महाराष्ट्र@२०४७’ च्या दिशेने सुरु झालेल्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने ‘विकसित भारत@२०४७’च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे मुख्य ध्येय देवेंद्रजींनी आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने ठेवले आहे. त्यासाठीचे ‘विकसित महाराष्ट्र@२०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीरही केले आहे.
राज्याच्या संतुलित विकासाला चालना देण्यासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या चार स्तभांच्या अंतर्गत विविध क्षेत्रे निश्चित केली आहेत. शेतकरी, महिला, युवा, गरीब, विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आज महायुती सरकारने केला आहे.


