पुणे: सेवा संस्थांच्या पाठीशी उभी राहणारी समाजाची शक्ती मोठी आणि संवेदनशील आहे. उमेद फाउंडेशनसारख्या संस्था अत्यंत कठीण परिस्थितीत दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी जे कार्य करत आहेत, त्याला समाजाने आपली जबाबदारी मानून साथ दिली पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.
कोथरूडमधील उमेद फाउंडेशन या संस्थेने पौड येथे उभारलेल्या ‘बालक-पालक’ या दोन मजली विशेष वसतिगृह प्रकल्पाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. लोकाश्रयातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पात मतिमंद मुले आणि त्यांच्या पालकांच्या निवासाची व प्रशिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे. या भेटीदरम्यान भय्याजी जोशी यांनी प्रकल्पातील सुविधांची पाहणी केली.
यावेळी पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, संभाजी भागाचे संघचालक प्रा. अनिलजी व्यास आणि परमहंसनगरचे संघचालक श्री. बापू जगताप उपस्थित होते. संभाजी भागाचे कार्यवाह रवीजी लाटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
भय्याजी म्हणाले,या प्रकल्पाला आपण ‘शुभेच्छा’ देऊ शकत नाही, कारण शुभेच्छा म्हणजे गरजूंची संख्या वाढणे. त्याऐवजी आपण अशी अपेक्षा करूया की, हे कार्य करताना येणाऱ्या अडचणी किमान असाव्यात आणि त्या लवकर दूर व्हाव्यात. सेवा प्रकल्पांना केवळ आर्थिक मदत करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष तिथे राहून काम करणे कठीण असते. उमेद फाउंडेशन हेच कठीण काम आत्मीयतेने करत आहे.
सौ. उमाताई जोशी यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रतिकूल प्रवास उपस्थितांसमोर मांडला.जयंतराव पारखी यांनी या संस्थेचे वेगळेपण सांगतानाच, सेवाकार्य समाजापर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी स्वीकारल्याचे नमूद केले.संस्थेचे संस्थापक संचालक राकेश सणस यांनी प्रकल्पाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाची सांगता विशेष विद्यार्थिनी स्नेहा पुरंदरेने गायलेल्या पसायदानाने झाली. याप्रसंगी सीमाताई दाबके, प्रतिभाताई केंजळे, आदि उपस्थित होते.
उमेद’च्या सेवाकार्याला समाजाच्या संवेदनशीलतेची साथ हवी: भय्याजी जोशी
RELATED ARTICLES


