Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व...

*केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण*

*‘निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी – डॉ. मनसुख मांडविया*

*नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याला शासनाचे प्राधान्य – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर*

पुणे, दि.१०: ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायींसह प्रत्येकाचे योगदान आवश्यक असून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याच्या ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात वैद्यकीय व्यवसायी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.

‘जन सेहत सेतू’ शिबीराचे उद्घाटन व पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख बोलत होते. सिम्बॉयसिस ऑडिटोरियम विमाननगर येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. कृष्णप्रकाश, आरोग्य अधिकारी नीना बोराडे, न्यूरोमायलिटिस ऑप्टिकाचे अध्यक्ष अमोल लुंकड, संघटक प्रशांत चौधरी, विविध संघटना, रोटरी क्लब, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, आशा सेविका उपस्थित होत्या.

केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मांडविया पुढे म्हणाले, वैद्यकीय व्यवसायींवर देशाच्या नागरिकांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी आहे. ७५ वर्षांपूर्वी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसत. त्यावेळी वेदशाळांच्या माध्यमातून नागरिकांचा उपचार होत असे. त्यावेळी उपचारासाठी पैशाला प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टरांचे काम म्हणजे व्यवसाय नसून एक जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

डॉ. मांडविया पुढे म्हणाले, पुणे शहरातील विविध संघटना व संस्थांच्या पुढाकाराने तज्ज्ञ वैद्यकीय व्यवसायींनी पुढे येऊन दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने ‘जनसेहत सेतू अभियान’ राबविण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. प्रत्येकाने आपापल्यापरीने वेळ, संपत्ती व ज्ञानाचे दान देऊन समाजाची सेवा करावी. या शिबिरांबाबत आशासेविका, सेवाभावी संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करुन अभियानाला राष्ट्रव्यापी बनवावे. अशाच प्रकारचा उपक्रम देशभरात राबविण्यासाठी वैद्यकीय व्यवासायींनी पुढाकार घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

*नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याला शासनाचे प्राधान्य – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर*
श्री. आबिटकर यावेळी म्हणाले, राज्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा तत्पर, दर्जेदार व मोफत मिळाव्यात अशी शासनाची भूमिका आहे. नागरिकांच्या मनात आजारांचे स्वरूप आणि खर्चाच्या अनुषंगाने वैद्यकीय सेवा व दवाखान्याबाबत भिती असते. त्यामुळे ‘जन सेहत सेतू’ अभियानाच्या माध्यमातून एक दिवस सेवा समर्पित करणे हे महाराष्ट्रातील व देशातील आदर्श उदाहरण ठरेल. देशातील महत्त्वपूर्ण अशी आरोग्य सेवा शिबीरांच्या माध्यमातून देण्याची सुरुवात पुण्यातून होत आहे याचा आनंद आहे. सर्व डॉक्टर्सनी या अभियानाची सुरुवात करावी. वैद्यकीय सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु, उपचारापेक्षा प्रतिबंध हाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. जन सेहत सेतू शिबीरांची सुरुवात संपूर्ण देशात व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा राज्यातील अधिकाधिक नागरिकांना व्हावा असा प्रयत्न आहे. भारत सरकारच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महाराष्ट्रातील काम गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये १ कोटी रुपयांपर्यंतचे मोफत उपचार ईएसआयसीच्या दवाखान्यात होतात. ईएसआयसीच्या सर्वाधिक सेवा राज्यातील नागरिकांना मिळाव्यात अशी विनंती केंद्र शासनाला केली आहे.

श्रीमती नागपुरे म्हणाल्या, सर्वोत्तम मनुष्यबळ ही राष्ट्राची शक्ती आहे. आरोग्याची निगा राखण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली, चौरस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासोबत नियमित आरोग्य तपासणीला महत्त्व आहे. विशेषत: महिलांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. महिलांनी आरोग्य तपासण्यांना न घाबरता नियमित आरोग्य तपासणी करावी. ‘जन सेहत सेतू’ शिबीरांची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी या शिबीरांमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स, सेवाभावी संस्थांचा सन्मान करण्यात आला.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments