*
पुणे, दिनांक १० एप्रिल २०२६ : “आत्मविस्मृत राष्ट्र विनाशाकडे वाटचाल करते. आजही वसाहतवादी मानसिकतेने भारताची स्व-आधारित व्यवस्था नष्ट केली आहे. स्वातंत्र्यानंतर आता विकसित भारतासाठी ‘स्व’ आधारित राष्ट्रनिर्माण करणे ही आपली ‘सिव्हिलायझेशनल ड्युटी’ आहे,” असे प्रतिपादन प्रख्यात लेखक आणि प्रज्ञा प्रवाहाचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केले.
कोथरूडमधील मयूर कॉलनी येथे आयोजित ‘भारतीय संस्कृती संगम’ व्याख्यानमालेत ‘स्वबोध’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त आयकर आयुक्त डॉ. सुहास कुलकर्णी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर उपस्थित होते.
जे. नंदकुमार म्हणाले की, “प्रत्येक राष्ट्राचा एक वेगळा ‘स्व’ असतो. विश्वकल्याण हा भारताचा स्वबोध आहे. भारतीय संस्कृती प्राचीन, चिरंतन आणि नित्यनूतन आहे. स्वातंत्र्यसंग्रमाच्या काळात सर्वच क्षेत्रांत स्व-आधारित दृष्टिकोन विकसित झाला होता, मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर त्यावर पुरेशी चर्चा झाली नाही. परिणामी, आपण जिथे पोहोचायला हवे होते, तिथे पोहोचू शकलो नाही.”
“भारताचा आत्मबोध हा केवळ मनुष्याचा विचार करणारा नसून तो संपूर्ण प्रकृतीचा आणि जगाच्या कल्याणाची कामना करणारा आहे. ‘सर्वे सन्तु निरामया’ ही आपली भावना आहे. राष्ट्रीयत्व म्हणजेच सनातन धर्म असून हीच भारताची राष्ट्रीय चेतना आहे. देशाला विभागण्याचे प्रयत्न होत असताना, आपली अस्मिता आणि स्व- भाव संस्कारांची मूल्ये जपणे आवश्यक आहे,” असेही जे.नंदकुमार यांनी नमूद केले.
जातिभेदाची तेढ दूर करणे आवश्यक : डॉ. सुहास कुलकर्णी
डॉ. सुहास कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात आत्मबोधाच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, “भौतिक जगतात वावरताना व्यावहारिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यात स्वतःची ओळख अर्थात स्व- बोध असणे महत्त्वाचे आहे. सध्या जाती-पातीत तेढ निर्माण करून समाजाला कमकुवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वेळी आत्मबोधाची जागृती होणे काळाची गरज आहे.” सूत्रसंचालन श्रद्धा लाळे यांनी केले.


