Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतामध्ये २०५० पर्यंत पार्किन्सन रोगाचे वाढते संकट: रुग्णसंख्येत वाढ, उपचारातील असमानता आणि...

भारतामध्ये २०५० पर्यंत पार्किन्सन रोगाचे वाढते संकट: रुग्णसंख्येत वाढ, उपचारातील असमानता आणि मजबूत सहाय्य व्यवस्थेची तातडीची गरज

भारतामध्ये २०५० पर्यंत पार्किन्सन रोगाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीमागे अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, देशातील वृद्ध लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर वाढलेली आयुर्मर्यादा, सुधारित निदान पद्धती, तसेच कीटकनाशके आणि वायूप्रदूषण यांसारख्या पर्यावरणीय घटकांच्या वाढत्या संपर्कामुळेही या आजाराचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. ‘किंग्स पार्किन्सन रिसर्च अलायन्स इंडिया’ (२०२६) च्या अलीकडील अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पार्किन्सन रुग्णसंख्या असलेला देश बनू शकतो, आणि सुमारे ४५% रुग्ण हे ‘यंग-ऑनसेट’ गटात मोडतात.

मात्र, या वाढत्या भाराचा सामना करण्यासाठी भारताची तयारी अद्याप असमान आहे. शहरी भागांमध्ये न्यूरोलॉजिस्ट, मूव्हमेंट डिसऑर्डर तज्ज्ञ, तसेच ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’सारख्या प्रगत उपचारांची उपलब्धता तुलनेने चांगली आहे. परंतु, ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, निदान सुविधा आणि पुनर्वसन सेवांची कमतरता अद्यापही जाणवते. पार्किन्सन हा तीव्र (acute) नसून दीर्घकालीन आजार असल्याने रुग्णांना सतत वैद्यकीय देखरेख, औषधांमध्ये बदल आणि फिजिओथेरपीची आवश्यकता असते. पूर्वी या आजाराचे निदान झाल्यानंतर ५–६ वर्षे आयुष्य उरते असे मानले जात होते, परंतु आधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे आज अनेक रुग्ण २५–३० वर्षे सक्रिय जीवन जगू शकतात.

पार्किन्सन हा बहुघटक (multifactorial) आजार आहे. काही प्रमाणात आनुवंशिकता कारणीभूत असली तरी बहुतेक प्रकरणांमध्ये पर्यावरणीय घटक आणि व्यक्तीची जैविक प्रवृत्ती यांचा परस्परसंवाद हा प्रमुख कारण ठरतो. दीर्घकाळ कीटकनाशके किंवा वायूप्रदूषणाच्या संपर्कात राहणे यामुळेही धोका वाढतो.

वैद्यकीयदृष्ट्या पार्किन्सनचा संबंध फक्त हातपाय थरथरण्याशी जोडला जातो, पण त्याची लक्षणे यापेक्षा खूप व्यापक आहेत. ब्रॅडीकिनेशिया (हालचाली मंदावणे), स्नायूंमध्ये कडकपणा, चालताना हात न हलवणे, शरीराच्या पोश्चरमध्ये बदल, आणि चेहऱ्यावर कमी भाव दिसणे ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात. पुढील टप्प्यांमध्ये चालणे, कपडे घालणे, अंघोळ करणे, दाढी करणे, वाहन चालवणे यांसारख्या दैनंदिन कामांमध्ये अडचणी येतात. रुग्ण वारंवार पडू शकतात, बोलण्यात आणि गिळण्यात अडचण येऊ शकते, तसेच कडकपणा वाढतो. परिणामी, रुग्ण अधिकाधिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून होतात. काही प्रकरणांमध्ये स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) आणि नैराश्य (डिप्रेशन) देखील दिसून येते.

सध्या उपलब्ध उपचार प्रामुख्याने लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यावर केंद्रित आहेत; मात्र आजाराची प्रगती थांबवणारे (disease-modifying) उपचार अद्याप उपलब्ध नाहीत. डोपामिन वाढवणारी औषधे, ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन कार्यक्रम रुग्णांच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणात सुधारणा करू शकतात, परंतु आजार पूर्णपणे थांबवणे शक्य नाही.

अलीकडील प्रगतीमध्ये ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ ही शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. यात मेंदूमध्ये एक प्रकारचा ‘पेसमेकर’ बसवला जातो, ज्याच्या वायर त्वचेखालीून छातीपर्यंत जातात. ही पद्धत विशेषतः उशिरच्या टप्प्यातील आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते.

भारतामध्ये वाढत्या पार्किन्सन रुग्णसंख्येमुळे ‘केअरगिव्हर’ची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. बहुतेक वेळा कुटुंबातील सदस्यच ही जबाबदारी पार पाडतात, परंतु त्यांना योग्य प्रशिक्षण किंवा बाह्य सहाय्य मिळत नाही. यामुळे त्यांच्यावर भावनिक, शारीरिक आणि आर्थिक ताण वाढतो. हा आजार दीर्घकालीन असल्यामुळे केअरगिव्हर्ससाठी शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये पार्किन्सन सपोर्ट ग्रुप्स कार्यरत आहेत, जे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन आणि मानसिक आधार देतात.

एकंदरीत, पार्किन्सन रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, भारताने आरोग्य सुविधा, तज्ज्ञांची उपलब्धता आणि केअरगिव्हर सपोर्ट सिस्टीम यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments