जागतिक स्तरावर भारतामध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण सर्वाधिक पैकी असताना,आयुष्यभर व्यवस्थापनावरून प्रभावी प्रतिबंध आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.
दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून ओळखला जातो. थॅलेसेमिया हा अनुवंशिक विकार असून पुरेसे हिमोग्लोबिन तयार करण्यास शरीर असमर्थ ठरते.त्यामुळे लाल पेशींची प्राणवायू वाहक क्षमता कमी होते आणि त्यामुळे दीर्घकालीन कमकुवतपणा आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
थॅलेसेमिया मेजर या आजाराने जन्मलेल्या बालकांना आयुष्यभर रक्तसंक्रमणाची आणि आयर्न सेलेशन थेरपीची अनेकदा गरज भासू शकते.त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर भावनिक,मानसिक आणि आर्थिक ताण पडू शकतो. थॅलेसेमिया हे मेजर,इंटरमीडिया आणि मायनर या तीन प्रकारांत विभागला जातो.यातील तीव्र स्थितीत सातत्याने वैद्यकीय सेवांची गरज भासते.थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्ती सामान्यपणे आयुष्य जगू शकतात,मात्र नकळतपणे हा जनुक पुढे संक्रमित करू शकतो.
थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टरच्या अध्यक्ष डॉ.नीता मुन्शी म्हणाल्या की,नवीन रूग्णांची संख्या रोखण्यासाठी व्यापक जनजागृती,वाहक तपासणीची (कॅरिअर्स स्क्रीनिंग) सक्ती,समुपदेशन आणि प्रसूतीपूर्व निदान सेवांची उपलब्धता या अत्यावश्यक बाबींची नितांत गरज आहे.
थॅलेसेमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे.दोन वाहकांमध्ये लग्न झाल्यास त्यांचे मूल तीव्र थॅलेसेमिया सह जन्माला येऊ शकते.यामुळेच लग्नाआधी कॅरिअर्स स्क्रीनिंग आणि गर्भावस्थेत चाचण्या या महत्त्वाच्या आहेत.बोन मॅरो प्रत्यारोपण हे केवळ जुळणारे दाते उपलब्ध असणाऱ्या रूग्णांच्या एका लहान गटापुरतेच मर्यादित असल्याने बाधित मुलांचा जन्म वेळीच रोखणे हे योग्य धोरण ठरेल.
भारतात दरवर्षी तब्बल 12,000 ते 15,000 थॅलेसेमिया मेजरचे नवीन रूग्ण आढळतात.तसेच 1,00,000 हून अधिक रूग्ण जगण्यासाठी नियमित रक्तसंक्रमणावर अवलंबून असतात.जगात थॅलेसेमिया जनुकाचे वाहक असलेल्या लोकांची संख्या अंदाजे 60 ते 80 दशलक्ष इतकी आहे.या सर्व बाबी लक्षात घेता प्रतिबंधात्मक धोरणे अधिक बळकट करणे हे पुढच्या पिढीसाठी थॅलेसेमियामुक्त भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वा
चे ठरेल.


