Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*वन विभागाकडे ७२७ कोटींच्या हरित संपत्तीची जबाबदारी*

*वन विभागाकडे ७२७ कोटींच्या हरित संपत्तीची जबाबदारी*

 

 

पुणे, दि. १६ (जिमाका, वृत्तसेवा) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सुमारे ७२७ कोटी रुपयांच्या हरितीकरण प्रकल्पाची जबाबदारी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील सर्वात मोठ्या महामार्ग हरितीकरण प्रकल्पाच्या संवर्धनासाठी वन विभागाची भूमिका अधिक बळकट होणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी सुनिल शिंदे यांनी दिली आहे.

 

नागपूर ते ठाणे दरम्यानच्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गालगत ४,५०० हेक्टर क्षेत्रात ३० लाखांहून अधिक वृक्ष व वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ११.३२ लाख वृक्ष, १२.५४ लाख झुडपे, ३.८० लाख वेली, सुमारे ३ लाख बांबू आणि २.९६ लाख अगेव वनस्पतींचा समावेश आहे.

 

या हरित संपत्तीच्या संवर्धनासाठी अत्याधुनिक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली असून, त्यामध्ये 70 विहिरी, 12 जलस्त्रोत, 9 जलसाठे, 81 पंपगृहे, 2 हजार 287 किलोमीटर जलवाहिन्या अणि 10 हजार 256 किलोमीटर ठिबक सिंचन जाळे विकसित करण्यात आले आहे. वृक्षलागवड, देखभाल, संवर्धन आणि सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी वन विभागाकडे राहणार आहे. यासाठी आवश्यक निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

या हस्तांतरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, समृद्धी महामार्गावरील हरित पट्टा पर्यावरण संरक्षण, कार्बन शोषण, जैवविविधता संवर्धन तसेच प्रदूषण नियंत्रणात महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचेही विभागीय वन अधिकारी सुनिल शिंदे यांनी कळविले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments