पुणे: अदिश जैन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हास्यकविता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी नवी पेठेतील लोकमान्य वाचनालयाजवळ अक्षरवेल सभागृहात हा महोत्सव होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती आदिश जैन फाउंडेशनच्या प्रमुख, कवयित्री मृणाल जैन यांनी दिली.
वर्धापन दिनानिमित्त अदिश जैन फाउंडेशनतर्फे खुली हास्यकवितालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देश-विदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण आणि प्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात दुपारी ३.३० वाजता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी विजेत्या हास्य कवितांचे अभिवाचनही केले जाणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात अष्टपैलू साहित्यिक कै. आचार्य अत्रे यांच्या जयंतीच्या निमित्त सायंकाळी ५.३० वाजता ख्यातनाम हास्यकवी बंडा जोशी यांच्या विडंबन गीतांची ‘झेंडूची नवी फुले’ ही हास्यमैफल सादर होणार आहे.


