पुणे, १७ ऑगस्ट: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ च्या दिशेने देश वाटचाल करीत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जपावी. रिसोर्सेस, एनर्जी आणि तंत्रज्ञानाबरोबरच सर्व क्षेत्रांत देशामध्ये आमुलाग्र बदल घडताना दिसत आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या देशातील सर्वात मोठी शक्ती ही आजची युवा पिढी आहे,” असे मत सेवानिवृत्त वायुसेना प्रमुख आर. के.एस. भदोरिया यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड कॅम्पस येथे आर. के.एस. भदोरिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक विश्वस्त प्रा. पी.बी. जोशी, एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
आर. के.एस. भदोरिया म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी, स्पेस आणि अन्य क्षेत्रांमध्ये देश प्रगतीने वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरतानाच चारित्र्य निर्मितीवरही भर द्यावा. एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यावर अधिक भर दिला जात आहे. येणाऱ्या काही वर्षांत भारत सर्वाधिक बलशाली देश म्हणून उदयास येईल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण यांच्या आधारे प्रत्येकाने देशसेवा करावी. तसेच प्रत्येकाने माता-पिता आणि देशसेवेचे कर्तव्य बजावावे.”
डॉ. राहुल व्ही. कराड म्हणाले, “येणाऱ्या पिढीने कोलोनियल माईंडसेट बाजूला ठेवावा. सर्व विद्यार्थ्यांसाठी एनसीसी सक्तीची करावी. वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर एमआयटीची उभारणी आहे.”
याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी स्लो मार्चिंग करत पाहुण्यांना ध्वजवंदन स्थळी आणले. एनसीसी पथकाने रूट मार्च करत मानवंदना दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
डॉ. दत्ता दंडगे यांनी प्रास्ताविक आणि हजारो विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या रक्षणाची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंभूराज बानगुडे- पाटील आणि क्रिष्णा पाटील या विद्यार्थ्यांनी मानले.


