Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश*

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश*

*

पुणे, दि. २० : रागाच्या भरात किंवा नकळत झालेल्या चुकीची शिक्षा भोगत असतानाच बंदी बांधवांमधील चांगला माणूस जागवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे. याच प्रयत्नांना कलात्मकतेची जोड देत बंदी बांधवांच्या हातून यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमांतर्गत बंदी बांधवांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या कलागुणांना वाव देतानाच आत्मविश्वास वाढवणे, प्रायश्चित्ताची भावना सकारात्मक कृतीत रूपांतरित करणे आणि समाजाशी पुन्हा नाते जोडण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृतींना लाजवतील अशा सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती या प्रशिक्षणातून तयार झाल्या आहेत. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, पुंडलिक खलोलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदी बांधवांना मूर्तीकलेचे मार्गदर्शन केले.

बंदी बांधवांनी साकारलेल्या या गणेशमूर्ती समाजाने भक्तिभावाने स्वीकारून आपल्या घरी प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन कारागृह सुधार सेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ आणि अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम यांनी केले आहे. या उपक्रमातून बंदी बांधवांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील सकारात्मक परिवर्तनाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री गायत्री क्लिनिक, खडक माळ, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रोड, पुणे येथील स्टॉलवर करण्यात येत आहे. शाडू मातीपासून तयार केलेल्या या मूर्ती पर्यावरणपूरक असून, त्यांची खरेदी करून नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘बाप्पा’च्या मूर्तीसोबत परिवर्तनाची आशाही घरोघरी पोहोचावी, हा या उपक्रमाचा संदेश आहे. समाजातील नागरिकांनी पुढे येऊन बंदी बांधवांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या पुनर्वसनाच्या या प्रयत्नांना पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments