पुणे, दि. २१ – प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा जपणाऱ्या हस्तलिखितांचा ठेवा केंद्रशासनाच्या “ज्ञानभारतम्” या अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी खुला होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे संचालक इंद्रजित सिंग यांनी आज येथे केले.
महाराष्ट्रातील हस्तलिखितधारक निवडक व्यक्ती आणि काही संस्थांशी भांडारकर संस्थेत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्यातील शंभराहून अधिक व्यक्ती आणि संस्थांची उपस्थिती होती. हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन आणि संशोधन करण्याच्या या उपक्रमात भांडारकर संस्था तसेच रामटेकचे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय या संस्था समूह केंद्र म्हणून तर आनंदाश्रम संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळ हे स्वतंत्र केंद्र म्हणून सहभागी आहेत.
सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्रात चांगल्या स्वरूपाचे झालेले असून विद्वत्ता आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात महाराष्ट्र या प्रकल्पातही अग्रेसर राहील असा विश्वास “ज्ञानभारतम्”चे प्रकल्प-संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांनी केले. महाराष्ट्राकरिता “ज्ञानभारतम्”चे नोडल ऑफिसर म्हणून राज्य पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगले हे काम पाहत आहेत. आजवर झालेल्या कामाचा आणि सर्वेक्षणाचा आढावा त्यांनी आज घेतला. नुकत्याच झालेल्या हस्तलिखितांच्या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातून सात लाख पोथ्यांची नोंदणी झालेली आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्र समन्वयक डॉ. वीणा राज उपस्थित होत्या.
भांडारकर संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी प्रास्ताविक केले, तर मानद सचिव सुधीर वैशंपायन यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले.
—–


