पुणे- भारताचा हिंदुत्वाचा प्रवास, आध्यात्मिक विचार आणि विश्व मांगल्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघ कटीबद्ध आहे. भारताचे इप्सित कार्य हे विश्वएकता साध्य करणे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी केले.
भारतीय विचार साधनाच्या वतीने ‘अथातो संघजिज्ञासा’ ‘अखंड भारत’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले त्याप्रसंगी प्रदीप जोशी बोलत होते. मधुभाई कुलकर्णी यांनी रा. स्व. संघाचा प्रवास मांडणारे ‘अथातो संघजिज्ञासा’ तर ‘अखंड भारत हे डॉ. श्री. सदानंद सप्रे लिखित पुस्तक चित्तरंजन भागवत यांनी अनुवादित केले आहे. यावेळी रा. स्व. संघाचे पूर्वअखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
जोशी पुढे म्हणाले की, मधुभाईनी आपले अनुभव एकत्र केले आहेत जे पुस्तक रूपाने आले आहेत. समाजाची परिस्थिती कशी होती,हिंदुत्वाचे काम त्याकाळात करणारी माणसे कमी नव्हती. पू. हेडगेवार यांनी एक पद्धती व शिस्त घेऊन संघटना स्थापन केली. बोलणे व कृती समान ठेऊन हिंदुत्वाला योग्य रितीने व्यक्त करणारे संघटन त्यांनी केले. भारताचा हिंदुत्वाचा प्रवास, आध्यात्मिक विचार आणि विश्वमांगल्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघ कटीबद्ध आहे, भारताचे इप्सीत कार्य हे विश्वएकता साध्य करणे आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ गिरीश आफळे, उपाध्यक्ष चित्तरंजन भागवत उपस्थित होते. विभावरी बिडवे यांनी पुस्तक परिचय करून दिला तर लेखकांच्या वतीने उमेश खंडेलवाल यांनी लेखक मनोगत वाचून दाखवले.
डॉ अनिरुद्ध देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले की, अथातो संघजिज्ञासा हे पुस्तक संघाचे मूळ चिंतन आहे. संघ काय करू इच्छितो या पुस्तकाद्वारे आपल्याला समजते. नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे संघ कार्यपद्धतीबद्दल आकर्षण असते. ही जिज्ञासा हे पुस्तक नक्की पूर्ण करेल,संघाबद्दलच्या गुंजनाचे हे संपन्न पुस्तक हाती आले आहे.
उमेश खंडेलवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्रीकृष्ण कात्रे, यांनी आभार मानले. पुस्तके भाविसा प्रकाशनात सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.


