पुणे, २४ एप्रिल २०२४ : वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे (WCIP), या पुण्यातील सर्वांत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाळेत ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त २२ ते २६ एप्रिल दरम्यान साहित्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित या महोत्सवात प्रसिद्ध लेखक, निर्मात्या आणि चित्रपट निर्मात्या डॉ. मंजिरी प्रभू यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते लेखक आणि कवी प्रा. रणधीर खरे यांनी सहभाग घेतला.
महोत्सवाची सुरुवात प्रा. रणधीर खरे यांच्या भाषणाने झाली. त्यांनी ‘शब्दांना जिवंत कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले. कथाकथनाची आवड आणि शब्दांच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास असलेल्या प्रा. खरे यांनी नवोदित लेखकांना कल्पकतेच्या या मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यानंतर सर्जनशील लेखन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यात कनिष्ठ आणि वरिष्ठ शालेय विद्यार्थ्यांच्या मनात लेखनाच्या सर्जनशील क्षेत्राबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यावर भर देण्यात आला. प्रा. खरे यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या मालिकेद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता, स्वतःचे मत, विचार आणि दृष्टिकोन शोधण्यासाठी प्रोत्साहित केले.
प्रा. खरे म्हणाले, “वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनलसारख्या शाळेत राबविण्यात आलेली साहित्य संमेलनाची ही कल्पना अप्रतिम आहे, कारण इथली मुले विविध देशांमधील आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनाची कवाडे राष्ट्रीयत्वाच्या पलीकडे असलेल्या शक्यतांच्या जगाकडे उघडतात. अशा प्रकारचा उत्सव कल्पनाशक्ती, विचार आणि संस्कृतींना प्रोत्साहन देतो. कोणतीही कला आयुष्य बदलून टाकू शकते. त्यामुळे या शाळेचे हे उपक्रम प्रशंसनीय आहेत. शिक्षणक्षेत्रात शाळा अमूल्य सेवा देत आहे.
या संपूर्ण सप्ताहात विद्यार्थी स्पेलिंग बीज, उत्स्फूर्त भाषण, ग्राफिक कथा लेखन, रोमांचक वर्डल विझार्ड स्पर्धा यांसह विविध कार्यक्रमात सहभागी होतील. अभ्यास करतील. वरिष्ठ शालेय विद्यार्थी विल्यम शेक्सपियरचे कालातीत साहित्य आणि रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितांचा अभ्यास करतील. याव्यतिरिक्त, शाळेतर्फे आयोजित शैक्षणिक पुस्तक मेळाव्यात सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण साहित्यिक खजिन्याचा अनुभव घेता येईल आणि कथा, कल्पनेच्या जगात रमण्याची अनोखी संधी मिळेल.
डॉ. मंजिरी प्रभू यांनी विद्यार्थ्यांना साहित्याचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, “असे साहित्यिक उत्सव मानवाच्या वैयक्तिक, भावनिक आणि बौद्धिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत, जी समाजात शांतता राखण्यासाठी एक महत्त्वाची पूर्वअट आहे. साहित्य विचारांची खोली वाढवते, विचारांना चालना देते, त्यामुळे एक चांगला माणूस बनण्यास मदत होते. आपले साहित्यिक क्षितिज विस्तारण्यासाठी आणि विविध आंतरिक आवाजांमधून प्रेरणा घेण्यासाठी विविध शैलींमध्ये स्वतःला झोकून देणे महत्वाचे आहे.
या शब्दोत्सवाच्या यशाबद्दल बोलताना, वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणेचे संस्थापक मास्टर डॉ. मरे टॉड म्हणाले, “शिक्षक म्हणून आम्ही मुलांची मने घडविण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला चेतना देण्याचा प्रयत्न करतो. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही केवळ शब्दांच्या विस्तीर्ण दुनियेची दारे खुली केलेली नाहीत, तर आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात साहित्य आणि शिक्षणाबद्दल प्रेम वाढवून कुतूहलाची बीजेही रोवण्याचा प्रयत्न के
ला आहे.”


