पुणे, प्रतिनिधी –
लोकसभा निवडणूक निकाल एक इतिहास होता त्यात जे फेक नरेटिव्ह विरोधी पक्षांनी समोर केले ते आम्ही मतदार यांच्यापर्यंत पोहचून आता दूर केले आहे. जनतेचे पाठबळ आम्हाला मिळत असून आघाडी मधील बंडखोरी हा दुय्यम मुद्दा आहे. आम्ही जनतेसाठी केलेली कामे घेऊन समोर जात आहे. बटेगे तो कटेगे याबाबत प्रत्येकाचे मत स्वतंत्र असून आम्ही आमचे मत मांडले आहे. भाजप पक्ष कार्यकर्ता आधारित पक्ष असून बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख तयार असल्याने कमी वेळात देखील मतदार यांच्यापर्यंत निवडणुकीत आम्ही पोहचलो असे मत भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.
पांडे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५९ मतदारसंघात आमचे २० हजार बूथ आहे. यापैकी भाजप २६ जागा लढत असून त्यात आठ हजार बूथ आहे. या सर्व जागा आमच्या निवडून येतील. सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात चांगले वातावरण आहे. आमच्या संकल्प पत्रास जनतेत सकारात्मक स्वीकारले आहे.देशातील विविध राज्यातील अनेक नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , पदाधिकारी प्रचारासाठी राज्यात आले. संपर्कात आम्ही आघाडी घेतलेली आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक मतदारसंघात शेवटच्या दिवशी जाहीर सभा न ठेवता रॅली आणि कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूथ कार्यकर्ते यांच्याशी सवांद साधला आहे. याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून येईल आणि मतदान टक्का वाढलेला दिसेल. पश्चिम महाराष्ट्र मध्ये महायुतीचा स्ट्राईके रेट सर्वाधिक असेल.


