Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे तर साधक असावी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत;...

शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे तर साधक असावी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; पाषाण येथील लोकसेवा ई स्कूलचे उद्घाटन

पुणे, दिनांक २० ः शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नाही तर साधक असायला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप केवळ नियमन करणारे असू नये, तर ते शिक्षणासाठी पोषक ठरायला हवे, असे आग्रही मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पाषाण येथील लोकसेवा ई स्कुलच्या नवीन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, शास्त्रीय संगीत गायक महेश काळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उद्योजक पुनीत बालन, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक अॅड. वैदिक पायगुडे, माजी संचालक निवेदिता मडकीकर आदी उपस्थित होते.

शिक्षणाचा विषय चौकटीत अडकू नये म्हणून तो समाजाधारित असावा. त्यासाठी समाजाने त्याचे पोषण करावे, अशी भूमिका डॉ. मोहन भागवत यांनी मांडली. ते म्हणाले, “साक्षरता आणि शिक्षण यात फरक आहे. पोट भरणे म्हणजे शिक्षण नाही. तर माणूस होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. माणूस घडविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून एक व्रत आहे, सेवा आहे.” नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून राष्ट्राला पाहिजे तसे व्यक्ती निर्माण होईल, अशी आशा सरसंघचालकांनी व्यक्त केली.

शांतीलाल मुथा म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वोत्कृष्ट शैक्षणिक धोरण निर्माण झाले आहे. ज्यातून नवभारत निर्माण होईल. धोरण जरी चांगले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमनामुळे मूल्य शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थेसमोर आता अनेक आव्हाने उभी राहत आहेत.” कार्यक्रमाच्या सुरूवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत मान्यवरांना अभिवादन केले.

चौकट
पाठ्यपुस्तकांवर अजूनही वसाहतवादाची छाप – धर्माधिकारी
स्वातंत्र्यानंतर आजही आपल्या पाठ्यपुस्तकांवर वसाहतवादी मानसिकता असल्याची खंत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “पाठ्यपुस्तकातून आजही आपल्या देशाचा आणि संस्कृतीचा अशास्त्रीय आणि सत्याला धरून नसलेला इतिहास शिकविला जात आहे. भारत आणि भारतीय संस्कृतीला विरोध करणाऱ्या शक्तींचा वैचारिक व व्यावहारिक ठसा आजही पाठ्यपुस्तकांद्वारे पुढील पिढ्यांपर्यंत जात आहे. सरकार नावाची व्यवस्था काय करेल यावर न थांबता आपण आपल्या शुद्ध बुद्धीला जाणवेल असे विचार मांडले पाहीजेत.” भविष्याला दिशा देणारी आपली सनातन संस्कृती आणि आधुनिक शास्त्र यांचा मेळ घालायला हवा, असेही धर्माधिकारी म्हणाले.
—————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments