पुणे, २१ डिसेंबर : उत्तम व्यक्ती होऊन, सामाजिक कार्यात सहभागी होणे. सामाजिक परिवर्तनचे काम करणे. देशातील जातीपातीच्या राजकारणला विरोध करून, समाजातील सर्व व्यक्तींना एकत्र ठेवणे. आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करणे आणि नागरी कर्तव्यांचे पालन करणे. अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत असून, भारतीय भाषा, जीवनमूल्ये, तत्त्वे, संस्कृती टिकवण्यासाठी आमचा खटाटोप सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसल महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात पुणे लिट फेस्टमध्ये सुनील आंबेकर शनिवारी बोलत होते. यावेळी आंबेकर यांनी आरएसएस @ १०० या विषयावर आपले विचार मांडले. प्रा. नरेंद्र पाठक यांनी आंबेकर यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
आंबेकर म्हणाले की, हिंदुत्व म्हणजे समानता आणि एकत्व, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आपली संस्कृती फार प्राचीन आहे. या संस्कृतीचा मेमरी लॉस झाला होता. हा मेमरी लॉस रिकव्हर करण्यासाठी आमचे प्रयत्न होते. त्यात आम्ही यशस्वी झाल्यामुळे, आपल्याला सकारात्मक बदल दिसत आहेत. येत्या काळात आणखी सकारात्मक बदल दिसतील. संघाचे कार्यक्षेत्र हे भारत आहे. समाजातील अस्ताव्यस्त झालेल्या व्यवस्था जागेवर आणण्याचे काम आम्ही करतो. हिंदू समाज सक्षम व्हावा. हिंदू लोकांना सुरक्षा मिळावी. सामाजिक व्यवस्था समर्थ व्हावी, यासाठी संघ काम करतो. संघाचे नेटवर्क वाढून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे. सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, व्यवस्था बळकट व्हाव्यात, यासाठी संघ कार्यरत असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. देशाचे संविधान जागरूक राहायला हवे. त्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची गरज आहे. प्रभू रामाची जीवनमूल्यांचे पालन करण्यावर सर्वांनी भर देण्याची आवश्यकता आहे. समाजाने आपले लक्ष या जीवनमूल्यांवर देण्याची गरज आहे. राम मजबूत होईल, तर भारत मजबूत होईल आणि त्यानंतर जग मजबूत होईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
…
चौकट
…..
बांगलादेशातील हिंदुंपासून आपण शिकलो पाहिजे. त्यांच्यावर एवढे संकट आल्यानंतरही ते विरोध करीत आहेत. कट्टरपंथीयांच्या विरोधात ते लढत आहेत. त्यांचे दुःख हे आमचे दुःख आहे. त्यामुळे भारतीयांनी बांगलादेशातील हिंदूंच्यासोबत उभे राहण्याची आवश्यकता आहे. आपल्यापरीने बांगलादेशातील परिस्थीतीला विरोध दर्शविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर दबाव निर्माण होऊन, परिस्थिती सुधारू शकते, असे सुनील आंबेकर यांनी सांगितले.
….
चौकट
…
गेल्या पाच सहा वर्षात तंत्रज्ञानामुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेत भरपूर बदल झाले आहेत. कुटुंबातली व्यक्ती एकमेकांपासून दुरावत असल्याचे चित्र आहे. तंत्रज्ञानाला आणि संस्कृतीला आपल्या बाजारपेठेची वाटचाल ठरवू देऊ नका. याउलट तुमची संस्कृती आणि पारिवारिक संबंध हे तंत्रज्ञान , बाजारपेठेची वाटचाल ठरवतील, यादृष्टीने प्रयत्न करा. कुटुंब प्रबोधन आणि समाज प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी संघही तुमच्यासोबत आहे, असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले.


