पुणे, (२८ डिसेंबर) – पं.रघुनंदन पणशीकर, पं.शौनक अभिषेकी आणि ज्येष्ठ गायिका कल्पना झोकरकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरेल मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाचे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात शास्त्रीय संगीताची मैफल रंगली आणि उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उस्फूर्त दाद कलाकारांना दिली. या सत्रात पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, डॉ. विकास कशाळकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि उद्योजक संजय चितळे यांनी गोविंदराव बेडेकर यांच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षाला चित्रफितीच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या.
पं. अभिषेकी यांनी गायनाचा प्रारंभ भूपाल तोडी रागाच्या प्रभावी सादरीकरणाने केला. त्यानंतर राग आनंद भैरव आळविला आणि “कैसे रिझाऊ अब मन को” ही बंदिश सादर केली. त्यांना सुभाष कामत यांनी तबल्यावर तर संवादिनीवर लीलाधर चक्रदेव यांनी तसेच अमेद अभिषेकी, राज शहा आणि करण देगावकर यांनी साथ केली. गायन सेवा पूर्ण झाल्यावर पं. अभिषेकी यांनी गोविंदराव बेडेकर यांच्या विषयीच्या व्यक्तिगत आठवणींना उजाळा दिला.
त्यानंतर पं. रघुनंदन पणशीकर यांनी जयपूर अत्रोली घराण्याचा अतिशय प्रसिध्द पण तितकाच दुर्मिळ राग सुखिया बिलावल चे दर्शन रसिकांना अतुलनीय गायकी मधून घडविले. त्यांना तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथ केली तर शुभम खंडाळकर, राधिका जोशी यांनी साथ केली. या अतिशय दुर्मिळ रागाचे सौंदर्य गायनाच्या माध्यमातून उलगडत गेले. त्यावेळी रसिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन आनंद व्यक्त केला.
सकाळच्या सत्राचा समारोप जेष्ठ गायिका कल्पना झोकरकर यांच्या गान सेवेने झाला. त्यांनी बिलास खानी तोडी रागाचे कलात्मकतेने आणि सुरेल असे सादरीकरण केले. त्यांना सौम्या कोटणीस आणि तन्मयी जोशी या सांगलीतील गुरुकुलात संगीत शिक्षण घेणाऱ्या दोन शिष्यांनी साथ केली तर भरत कामत यांनी तबल्यावर आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथ केली.
————————————


