पुणे दि. 7: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारमार्फत स्थापन राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन ‘एल्डरलाईन- 14567’ वर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाईन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत आहे.
ही हेल्पलाईन कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून व मदतीने कार्यरत आहे. आज अखेर राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.
एल्डर लाईनचे कार्य 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 2 ऑक्टोबर वगळता वर्षातील 362 दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.
वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक, मालमत्ता, शेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, वेळ, ताण, राग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन, मृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने भावनिक मदत करण्यात येते, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिली आहे.
****


