नाशिक:- (प्रतिनिधी ) सर्वसामान्य व्यक्तींसाठी शासन विविध प्रकारे कार्य करत असते. शासनाचा योजना सर्वसामान्यांना माहिती व्हाव्यात. शासनाच्या सर्वच कल्याणकारी योजनांची माहिती जनतेसाठी अनमोल ठेवा असते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘शासन संवाद’ या पुस्तकावर ते बोलत होते. अजित कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विजय पवार पुढे म्हणाले की, शासन नेहमी जनतेच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबवून जनतेमध्ये विश्वास संपादन करत असते. शासन प्रत्येक माणसाला या योजनांचा उपयोग होईल, यासाठी सदैव प्रयत्नशील असते. आयुष्यमान योजना, श्रावणबाळ, सौर ऊर्जा योजना, जलद लोकन्यायालय, लोककलावंत मानधन योजना, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी मोफत बस सोय, आनंदाचा शिधा, बळीराजा आधार योजना अशा विविध योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या योजनांची सविस्तर लेखमाला तयार केली आणि त्यातून पुस्तक तयार झाले, असेही ते म्हणाले. संजय आहेर आणि मधुकर गिरी या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अलका दराडे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.११)रोजी ‘श्रमगाथा’ या पुस्तकावर रामचंद्र शिंदे हे ऐसपैस गप्पा करणार आहेत.
शासनाच्या योजना हा अनमोल ठेवा – विजय पवार
RELATED ARTICLES


