पुणे : शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे पेशवे काळापासून सुरू असलेली आणि आजही अखंडपणे जपली जाणारी कीर्तन परंपरा यंदाही हनुमान जयंतीपासून अक्षयतृतीया पर्यंत सलग १८ दिवस साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सलग १८ दिवस कीर्तन उत्सव सुरु असणारे हे बहुधा एकमेव मारुती मंदिर मानले जाते. सन २०२४ पासून ‘शनिवार वीर मारुती उत्सव मंडळा’च्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्री श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू झाली आहे. या वर्षीचा ‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना जाहीर झाला आहे. शनिवार, दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता वीर मारुती चौक येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती राम दहाड यांनी दिली.
कीर्तन उत्सवाच्या या पावन परंपरेत चारुदत्त बुवा आफळे, वासुदेव बुवा बुरसे, मकरंद बुवा दीक्षित यांसारख्या नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला असून, आजही ही परंपरा अखंड सुरू आहे. हा उत्सव कोणतीही वर्गणी न घेता, लोकवर्गणीतून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंपरांना जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्यात येतो.
शिवाजीराव गोपाळे यांनी गेल्या २५ वर्षांपासून ‘वीर’ परंपरेच्या जतनासाठी अथक प्रयत्न केले आहेत. २०० हून अधिक वीरांचे मोबाईल क्रमांक संकलित करणे, जुन्या पिढीचे दुर्मिळ फोटो गोळा करणे, यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या तळमळीने ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. ही परंपरा अधिक जिवंत राहावी म्हणून राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, ऍड.प्रवीण जोशी व सहकारी मंडळी ही उत्साहाने प्रयत्नशील आहेत.
*वीर मारुती आणि पानिपत युद्धाची पार्श्वभूमी
पानिपतच्या युद्धात शहीद झालेल्या मराठा योद्ध्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कुटुंबीयांनी या मारुतीला नवस केला आणि दरवर्षी धूलिवंदनच्या दिवशी आपल्या वंशजांना (वीरांना) दर्शनासाठी आणण्याची परंपरा सुरू केली. या परंपरेमुळेच या मारुतीला “वीराचा मारुती” असे संबोधले जाते. आजही, अनेक कुटुंबे आपल्या वीरांना पारंपरिक वेशात किंवा सद्याच्या पोशाखात, ढोल-ताशांच्या गजरात, समशेर घेऊन, उत्साहात या मारुतीला दर्शनासाठी आणतात.
———————————————
—


