Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedवसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा डॉ. शेषराव पाटील यांचे विचार ; रामदास...

वसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा डॉ. शेषराव पाटील यांचे विचार ; रामदास पुजारी लिखित ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे दि. १४ जून : ” मनाचे श्लोक सांगून रामदास स्वामी यांनी मनःस्थिती बलवान केली तर ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ या पुस्तकातून वनांचे श्लोक मांडून वनाधिकारी रामदास पुजारी यांनी वसुंधरा सुस्थितीत ठेवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. वसुंधरा चांगली राहिली तर मानवी जीवन उत्तम राहिल,” असे विचार सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांनी व्यक्त केले.
साहित्यविश्व प्रकाशन, पुणेद्वारा सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी लिखित ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील वनभवनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक व कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर.प्रविण  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक वनीकरण वृत्त, पुणेचे उपवनसरंक्षक पंकज कुमार गर्ग, विभागीय वनाधिकारी राम धोत्रे, माजी मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, रवी वानखडे, नानासाहेब लडकत, माजी विभागीय वन अधिकारी यशवंत पाटील, बबनराव हगवणे, मनोहर सैंदाणे, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, श्री. बोंगाळे, लेखक, कवी व माजी सहा. वनसंरक्षक रामदास पुजारी, प्रा. विजय लोंढे, कवी लक्ष्मण शिंदे व साहित्यविश्व प्रकाशनचे संस्थापक विक्रम मालन आप्पासो शिंदे उपस्थित होते.
एन.आर.प्रविण म्हणाले,” निर्सगाची सेवा केल्यामुळे लेखकाने या उत्तम पुस्तिकेची निर्मिती केली आहे. कमी शब्दांमध्ये प्रभावी संदेश देण्याचे सामर्थ्य घोषवाक्यांमध्ये आहे. रामदास पुजारी यांचे पुस्तक पर्यावरण जनजागृतीसाठी महत्वपूर्ण राहिल. वनविभागात कार्यरत मारूती चितमपल्ली यांनी निसर्गासाठी केलेल्या अमूल्य कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हेच कार्य वनविभागतील अन्य अधिकारी करतांना मोठा आनंद होत आहे.”
पकंज गर्ग म्हणाले,”पर्यावरणविषयक बाबी जतन केल्या तर भविष्यात त्याचे फार चांगले फायदे मिळतील. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच पर्यावरणाच्या संवर्धन व प्रबोधनासाठी एक माईलस्टोन ठरेल.”
रंगनाथ नाईकडे म्हणाले,” दासबोध आणि ज्ञानेश्वरीत निसर्ग संवर्धनाचा उल्लेख आहे.  संत तुकाराम महाराज यांनीसुद्धा निसर्ग संवर्धनाबद्दल सांगितले आहे. ही सर्व संपदा ग्रंथरुपाने उपलब्ध आहे. वर्तमान काळात स्लोगन हे अत्यंत बोलके असून ते थोडक्यात सर्व काही सांगून मनावर चांगला परिणाम घडवितात.”
रामदास पुजारी म्हणाले,” पर्यावरण व वसुंधरेचे रक्षणासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यासाठी जनजागृती आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून शाश्वत पर्यावरणासाठी कार्य करावे. लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षलागवड झाली तरच उद्याच्या श्वासाची तरतूद होईल.”
सूत्रसंचालन लेखक प्रा. विजय लोंढे यांनी केले. प्रकाशक विक्रम शिंदे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments