*
पुणे, दि. 16 जून – आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर एक राष्ट्रीय पातळीवरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा कौशलम् न्यास, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, सावरकर स्मारक आणि कॉसमॉस फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून घेण्यात येत असून याकरिता नोंदणी करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2025 असल्याची माहिती कौशलम् न्यासच्या प्रमुख़ विश्वस्त रोहिणी कुलकर्णी यांनी आज येथे दिली.
या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्याथी व प्रौढ नागरिक अशा तीन श्रेणीत ही स्पर्धा घेण्यात येणार असून निबंधाची भाषा हिंदी, मराठी, कोकणी, गुजराती, तेलगू व संस्कृत अशा सहा भाषेत आहे. संस्कृत भाषेसाठी मात्र फक्त एकच प्रौढ वयोगट ही श्रेणी ठेवण्यात आली आहे. प्रत्येक श्रेणीसाठी व प्रत्येक भाषेसाठी रोख रु. दहा हजार, रु. साडेसात हजार व रु. पाच हजार अशी प्रथम 3 पारितोषिके देण्यात येणार आहेत. ज्या शाळा, महाविद्यालय व संस्था यांच्याकडून जास्तीत-जास्त निबंध येतील त्यांना विशेष प्रोत्साहनासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या निबंध स्पर्धेसाठी पौढ नागरिकांनी 7 ते 10 निकष घेऊन तीन हजार शब्दात (संस्कृतसाठी 5 ते 7 निकष बाराशे शब्दात), महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी (12 वीच्या पुढील) 7 ते 10 निकष घेऊन दोन हजार पाचशे शब्दात आणि शालेय विद्यार्थ्यांनी (12 वी पर्यंतचे) 3 ते 5 निकष घेऊन बाराशे शब्दात डिजीटल पध्दतीने निबंध सादर करावयाचा आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीचा शेवटचा दिनांक 30 जून 2025 असून निबंध सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2025 आहे. नोंदणीसाठी https://shorturl.at/nr6aL या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरावा व अधिक माहितीसाठी 8888234444 किंवा 9850832834 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले


