Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorized*महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे 'निरंजन' ने घेतले शैक्षणिक पालकत्त्व*  पुण्यातील निरंजन सेवाभावी...

*महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे ‘निरंजन’ ने घेतले शैक्षणिक पालकत्त्व*  पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेचा उपक्रम ; दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुणे जिल्हयातील विद्यार्थ्यांचा समावेश ; क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे विशेष सहकार्य

 

 

पुणे : केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणा-या महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुण्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करुन गरजू व गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्याचे कार्य संस्था अनेक वर्षे करीत आहे. याअंतर्गत पुणे आणि परिसरातील १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रम शनिवार, दिनांक २८ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक,वैभव लामतुरे, भारत वेदपाठक आदी उपस्थित होते.

 

सीए दुर्गेश चांडक म्हणाले, शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रमाला तौरल इंडिया चे संचालक भरत गीते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, राष्ट्रीय खो खो खेळाडू व म्हाडा अधिकारी संजय नाईक, महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्र क्षीरसागर, महाराष्ट्र बॉयलर विभागाचे संचालक संदीप चिवटे, संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

शैक्षणिक किट मध्ये १६ प्रकारच्या वस्तू असून या प्रत्येक विद्याथ्यार्ला देण्यात येणार आहेत. यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, एकेरी वह्या – २०० पानी व ५२ पानी, दुरेघी वह्या – ५२ पानी, पाण्याची बाटली, बॉल पेन, रंगीत पेन अशा वर्षभर पुरेल अशा वस्तूंचा समावेश आहे.

 

चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडावा आणि भविष्याच्या वाटा उज्ज्वल व्हाव्या, याकरीता संस्थेने बीडमधील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याच्या उपक्रमाला २०१२ साली सुरुवात केली. त्यानंतर पुणे, रायगडसह तोरणा, लोहगड, तुंग मधील व मुळशीतील नांदगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. त्यापाठोपाठ जम्मू-काश्मिरमधील आणि अहिल्यानगर मधील गरजू विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले.

 

सामाजिक बांधिलकी म्हणून मदत देण्यास अनेकजण इच्छुक असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ आणि दिशा मिळणेही तितकेच गरजेचे आहे. लहान मुलांचे शाळेत जाऊन शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असूनही केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान केले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ हून अधिक शाळा व संस्थांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments