पुणे : दीपावली हा सण जगभरात साजरा होतो. विविध देशात साजरा होणारा हा सण आपल्या आदिवासी पाड्यांवर साजरा करण्याकरिता पैसे नसतात. ही परिस्थिती पाहून हेलावणारी मने विविध संस्थांच्या रूपाने पुढे येतात आणि मदत करतात. जात, प्रांत, धर्म याहीपुढे आपला देश महत्वाचा आहे ही भावना रुजणे गरजेचे आहे, असे मत जगद्गुरुकृपांकित चेतनानंद महाराज पुणेकर यांनी व्यक्त केले.
प्रभात जनप्रतिष्ठान व प्रभात मित्र मंडळ, गुरुवार पेठ तर्फे महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे ‘आपुलकीची भाऊबीज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे दीपक उर्फ बाबा मिसाळ, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त मुख्य प्रबंधक जान्हवी जोगळेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे, सम्राट थोरात,नाना कांबळे, मंगेश शिंदे, हेमराज साळुंके, अमोल थोरात, रविंद्र भन्साळी उपस्थित होते.
चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले, समाजातील गरजू घटकांसाठी मदत नव्हे कर्तव्य या भावनेने कार्य करायला हवे. दुसऱ्याची प्रगती पाहून दु:खी होणारा समाज आहे. ही परिस्थिती बदलायची असेल. तर मन, बुद्धी, चारित्र्य, ज्ञान यावर ताबा ठेवता येणे गरजेचे आहे. या गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जान्हवी जोगळेकर म्हणाल्या, समाजातील गरजू घटकांना दिवाळीनिमित्त आपुलकीची भेट देऊन संस्थेने त्यांच्यावर आनंदाची फुंकर मारली आहे. आपल्या पाठीशी कोणीतरी कायम असते, ही भावना यानिमित्ताने त्यांच्यामध्ये निर्माण केली आहे, असेही त्यांनी सांगितले. दीपक मिसाळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले व हिंदू संस्कृती जतन केली जात आहे, असेही सांगितले. किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.


