पुणे : वंदे मातरम या एका गीताने किंवा या दोन शब्दाने सुद्धा अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांच्या हालअपेष्टा सहन करण्याचे प्रचंड सामर्थ्य मिळाले आणि परकीय शक्तीला या उच्चाराचे सुद्धा भय निर्माण झाले असे जन आंदोलन उभे करू शकणारी एक विलक्षण काव्यपंक्ती आहेत वंदे मातरम. आजही अनेक राष्ट्रभक्तांच्या मनामध्ये राष्ट्रभावना किंवा राष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी या गीताचे गायन अनेक ठिकाणी केले जाते. आजही या गीताचा अतिशय जबरदस्त प्रभाव राष्ट्रभक्त जनमानसावर आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे
देशभक्तीचे प्रतीक ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या अमर गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त नारद मंदिर संस्था आणि आफळे अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष राष्ट्रीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे ‘वंदे मातरम्’ या विषयावर कीर्तन सादर केले. राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
चारुदत्त आफळे म्हणाले, एखादे गीत अनेक वर्ष देशाच्या चैतन्याचा शब्द बनते असे भाग्य फार थोड्या शब्दांना लागतात. त्यात वंदे मातरम हे शब्द आहेत. साधारणतः या गीताचा जन्म जरी १८७५ मध्ये झाला तरीसुद्धा याचा प्रत्यक्ष प्रभाव आनंदमठ या कादंबरीमध्ये जेव्हा हे गीत आले, तेव्हा वाढू लागला ही कादंबरी साधारणतः १८८० ते १८८२ या काळात प्रसिद्ध झाली. पण पुढच्या काळामध्ये म्हणजे याही १८८० नंतर २५ वर्षे वाट पाहावी लागली आणि १९०५ च्या वंगभंग म्हणजे बंगाल फाळणीच्या आंदोलनामध्ये आम्ही भारत माता खंडित होऊ देणार नाही या भावनेला अनुसरून जो उद्रेक झाला, त्यामध्ये हे स्वातंत्र्याचे घोष गीत ठरले.
वंदे मातरम म्हणजे आम्ही या मातेची लेकर आहोत. १९०५ पासून जवळजवळ स्वातंत्र्य चळवळ अखेरीपर्यंत सुभाषचंद्र बोस यांच्या लढ्यापर्यंत सातत्याने हाच मंत्र सर्व योद्ध्यांना एक विलक्षण स्फुरण आणि प्रेरणा देणारा ठरत राहिला. जर्मनीमध्ये समाजवादी परिषदेत १९०७ साली मॅडम कामा यांनी जो भारताचा पहिला सांकेतिक राष्ट्रध्वज फडकवला त्याच्यावर सुद्धा वंदे मातरम अशीच अक्षरे होती.


