Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता; तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 10 : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुलास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. या दैवताचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि समाधीस्थळाला नमन करण्यासाठी तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. त्यामुळे तुळापूर – वढू बु. रस्ता भीमा नदीवरील पुलाद्वारे जोडण्यात यावा. सध्या 14 किलोमीटरचा रस्ता असून नागरिकांना तुळापूरहून वढू बुद्रुक येते येण्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागतो. भीमा नदीवरील पूल केल्याने हा रस्ता साडेसहा किलोमीटरचा होईल. त्यामुळे दोन्ही स्थळांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचेल.

 

भीमा नदीवरील हा पूल ‘व्हिवींग गॅलरी’सह असावा. पुलाची रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील इतिहासाची आठवण करून देणारी असावी. पूल दर्जेदार निर्मित करून नदीच्या घाटाचे कामही इतिहासाची आठवण करून देणारे असावे. नदी घाट आणि पुलावर प्रकाश योजना आणि सौंदर्यीकरण दर्जेदार असण्याबरोबर या ठिकाणी गाईडना प्रशिक्षण देण्यात यावे. त्यांना संपूर्ण ऐतिहासिक संदर्भांची माहिती असावी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण येथे येणाऱ्या प्रत्येकाला व्हावी, अशा पद्धतीने विकास कामे करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भीमा नदीवरील पुलाची रुंदी वाहतुकीला पर्याप्त असावी. पूल आणि व्हिविंग गॅलरी येथे येणाऱ्या प्रत्येकाने बघावी, अशा पद्धतीने निर्मित करावी. प्रस्तावित तुळापूर ते वढू बुद्रुक रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी. छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला येथे महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुन्हा येण्याची इच्छा होईल, अशा पद्धतीने विकास करावा.

 

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय आदी उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठकीत सादरीकरण केले. दूरदृश्य प्रणाली द्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.

 

थोडक्यात विकास आराखडा

 

स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, 82 आसनी क्षमतेचा 10 डी शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, 350 मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू आहेत.

 

समाधी स्थळ वढू बु येथे संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, १२० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत. तुळापूर येथे भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची ‘ व्हिविंग गॅलरी’ असणार. तसेच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments