Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबई खारघर येथे होणाऱ्या समागमासाठी शहरातून जाणाऱ्या नागरिकांशी आवश्यक समन्वय ठेवा -...

मुंबई खारघर येथे होणाऱ्या समागमासाठी शहरातून जाणाऱ्या नागरिकांशी आवश्यक समन्वय ठेवा – महापौर रवि लांडगे*  

 

 

*‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या नियोजनासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*

 

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२५ – ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातून सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधांचे सुयोग्य नियोजन करावे. समागमासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवास, समन्वय, सुरक्षितता तसेच जनजागृती मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या. याशिवाय, समागमाच्या अनुषंगाने विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त सूचनांची दखल घेत महापालिका स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

 

 

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात समन्वय बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, ममता शिंदे, संदीप खोत, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, राजू कांबळे, कार्यकारी अभियंता दिवेकर के. बी, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सुनिल चटोले, मोहन बिलडान, नरेंद्र तानर, गुरूमलसिंह, सुरिंदर सिंह नडीवाल, गुरूविंदरसिंह गिल, गोबिंदसिंह धावडा, एम. टी. भोरे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी) संप्रदायासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या कार्य व बलिदानाच्या इतिहासाला उजाळा देणार आहेत.

 

या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत समागमाच्या आयोजनाची रूपरेषा, विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन, तसेच आवश्यक प्रशासकीय समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध सामाजिक संघटना, धार्मिक संस्था व समाज प्रतिनिधी यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

बैठकीदरम्यान उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांमधून समागमासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासासाठी सुयोग्य नियोजन करून समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने शाळांमध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानाची प्रेरणा रुजेल, अशी सूचना आली. समागमासाठी शहरातून जाणाऱ्या नागरिकांसाठी महापालिका स्तरावर आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करावी, कार्यक्रमाची संपूर्ण शहरभर प्रभावी प्रचार प्रसिद्धी करावी तसेच जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करावे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विशेषतः सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव परंपरा समाजाची लोकसंख्या ज्या भागांमध्ये अधिक आहे, त्या भागांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याशिवाय, या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही सूचना यावेळी त्यांनी मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments