Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedआक्रमणांच्या काळात भक्ती आंदोलनानेच देश तारला*   डॉ. कृष्ण गोपालजी;...

आक्रमणांच्या काळात भक्ती आंदोलनानेच देश तारला*   डॉ. कृष्ण गोपालजी; महाराष्ट्रातील संतांची देशव्यापी क्रांती!

 

 

पुणे, दिनांक २८ फेब्रुवारी ः परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात जेव्हा राजकीय व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा भक्ती आंदोलनाने खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले. या चळवळीने समाजातील दोष दूर करत तथाकथित वंचित आणि उपेक्षित समाजाला नेतृत्त्वाची ऐतिहासिक संधी दिली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील संतांनीच या भक्तीच्या एकत्वाचे आंदोलन सर्वदूर पसरवून एक प्रकारे संपूर्ण देशात भक्तीची मोठी चळवळ उभी केली, ज्यामुळे भारताची अखंडता आणि जीवनमूल्ये सुरक्षित राहिली, असे मत भारतीय संतवाड्मयाचे अभ्यासक डॉ. कृष्णगोपालजी यांनी व्यक्त केले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषदे’त डॉ. कृष्णगोपलजी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर उपस्थित होते. डॉ. कृष्णगोपालजी पुढे म्हणाले, “परकीय आक्रमणे होत होती, राजे रणांगणात मारले जात होते आणि सेना हरत होत्या, अशा महाभयंकर संकटाच्या काळात देशाचे नेतृत्व कुणी करावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा संतांनी पुढे येत देशाचे नेतृत्व सांभाळले. आज भारत जो टिकून आहे, त्याचे संपूर्ण श्रेय या भक्ती आंदोलनाला जाते. भक्तीने देशाला केवळ एकता आणि समरसता शिकवली नाही, तर वेळ पडल्यास ‘शक्ती’ची उपासना कशी करावी, याचाही वस्तुपाठ घालून दिला.”

 

भक्ती आंदोलनाचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी समाजातील सर्व भेद संपवले. तिरस्कृत आणि उपेक्षित समजल्या जाणाऱ्या लोकांना नेतृत्त्वाची संधी दिल्याचे कृष्णगोपालजी यांनी सांगितले. ते म्हणाले, “प्रत्येक जाती, वर्ग आणि विशेषतः श्रमजीवी वर्गाने भक्तीमुळे समाजाचे नेतृत्व केले. संतांनी धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून देशाला कसे दिशादर्शन केले, यावर आज अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे.”

 

गरजपडल्यावर भक्तीने शक्तीचे रूपही धारण केले, त्यातूनच स्वराज्यासाठी आवश्यक वैचारिक पार्श्वभूमी निर्माण झाली, असेही डॉ. कृष्णगोपालजी म्हणाले. ते म्हणले,”उत्तर भारतात संत तुलसीदासांनी शस्त्रधारी रामाची मांडणी केली. तर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींनी तंजावर ते काश्मीरपर्यंत हनुमानाच्या मंदिरांच्या माध्यमातून शक्तीची उपासना शिकवणारे एक हजार आखाडे उभे केले. “देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ उडावा…” अशी मांडणी संतांनी केली. संत तुकाराम आणि संत रामदासांच्या भक्ती आंदोलनानेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला भक्कम आध्यात्मिक आणि वैचारिक पार्श्वभूमी पुरवली.”

——-

चौकट

– गीतेवरील मराठी भाष्याने मोठी ज्ञानक्रांती ः

वेदांमधील जीवनाचे मौलिक सिद्धांत आणि गूढ तत्त्वज्ञान जे केवळ संस्कृतपुरते मर्यादित होते, ते संतांनी लोकवाणीत आणले. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरील पहिले भाष्य मराठीत आणले, हे एक अत्यंत क्रांतिकारी परिवर्तन होते. यानंतर अध्यात्माचा प्रवाह सोपा झाला. रामानंद, कबीर यांनी हिंदीत काव्यरचना केली. भक्ती संप्रदायाने ईश्वराची प्राप्ती सुलभ केली, जिथे कोणत्याही मध्यस्थाची, मूर्तीची किंवा कठीण साधनांची गरज उरली नाही. ‘तत्त्वमसि’ हा वैदिक सिद्धांत संतांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले. संत नामदेवांनी पंजाबात जाऊन गुरुनानक देवांच्या भक्ती संप्रदायाचे बीजारोपण केले. शीख पंथाची उभारणी याच भक्ती संप्रदायाच्या मुळावर उभी आहे. गुरुगोविंद सिंह यांनी ‘खालसा’ पंथाची स्थापना करताना कोणतीही जात किंवा बिरादरी पाहिली नाही. ते स्वतः एक भक्त, संत, शिपाई आणि कुशल लोकसेनापती होते.

———

– भक्ती आंदोलन आणि महिला ः

भारतात मुळात पडदा पद्धत नव्हतीच, याचे पुरावे अजिंठा-वेरूळ लेण्यांमध्येही दिसतात. परकीय आक्रमणांच्या काळात गुरुकुल नष्ट झाले आणि बालिकांचे शिक्षण थांबले, ज्यामुळे उत्तर भारतात महिलांना पडदा घ्यावा लागला. मात्र, भक्ती प्रवाहाने महिलांनाही पुढे आणले. ११ व्या आणि १२ व्या शतकात महिला मठांच्या प्रमुख होत्या. संत मुक्ताबाईंसारख्या संत महिलांनी समाजाला मार्गदर्शन केले. दक्षिणेतील नयनमार आणि अलवार, महाराष्ट्रात विठ्ठल भक्ती, बंगालमध्ये ‘हरीबोल’, मणिपूरमध्ये कृष्णाची रासलीला तर आसाममध्ये संत शंकरदेवांचे कार्य; संपूर्ण देशात भक्तीचा एकच प्रवाह वाहत होता. अनंत विविधतेत समान एकतत्त्वाचे स्मरण या आंदोलनाने केले. आज जगात विविधतेवरून आणि असहिष्णुतेवरून मोठे संघर्ष होत असताना, भारताच्या भक्ती संप्रदायाने दिलेला ‘एकतेचा’ संदेश जगासाठी मार्गदर्शक आहे.

—————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments