पुणे : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळा महोत्सवात यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार ज्ञानेश्वर माऊली टाकळकर यांना, तर स्वामी समर्थ सेवा पुरस्कार दीपक आप्पा वायकर यांना प्रदान करण्यात आला.
शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे या पालखी सोहळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णा थोरात, विनायक घाटे, नामदेवराव मोहिते आणि राजाभाऊ वरखडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यंदा पालखी सोहळ्याचे २९ वे वर्ष साजरे करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाला जन्मेजयराजे भोसले, मोहनबुवा रामदासी, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.
मोहनबुवा रामदासी म्हणाले, काँग्रेस भवनात प्रत्यक्ष अक्कलकोट वसल्याचा अनुभव येत आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींची सेवा ही स्वामी चरणी अर्पण झालेली आहे. माऊली टाकळकर आणि दीपक वायकर यांच्या समर्पणाला मी विनम्र नमस्कार करतो.
महेश सूर्यवंशी म्हणाले, कोणत्याही अडचणीसाठी तांत्रिक किंवा मांत्रिकांची गरज नसते. स्वामी समर्थांच्या केवळ दर्शनाने विघ्ने दूर होतात, हे श्रद्धेचे सामर्थ्य आहे.
उत्सव काळात ‘रक्तदान महायज्ञ’ हा सामाजिक उपक्रम सर्व दिवस राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक घाटे यांनी केले.


