पुणे ६ एप्रिल २०२६: मधुमेह, रक्तदाब पाठोपाठ स्थूलता असलेल्या लोकांच्या संख्येमध्ये होणारी झपाट्याने वाढ चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सध्याच्या स्थितीत भारतात २४ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुष हे स्थूल आहेत असा अंदाज आहे.( एनएफएचएस-5 (2019-21). वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस अनुसार स्थूलतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे. हे भारतासमोरचे मोठे आव्हान आहे.
लठ्ठपणा हा केवळ जीवनशैली निगडीत प्रश्न नसून आता एक वैद्यकीय स्थिती म्हणून ओळखला जात आहे.अलीकडेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय कोडिंग प्रणाली (आयसीडी) मध्ये लठ्ठपणाला औपचारिकपणे एक आजार म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्यदिनानिमित्त सर्वांगीण आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली जाते. यावर्षीची संकल्पना ही हेल्थ फॉर ऑल – स्टँड बाय सायन्स ही आहे. त्याअर्थाने स्थूलता हा विषय केंद्रस्थानी घेऊन चांगल्या आरोग्यासाठी चांगली जीवनशैली आणि नियंत्रणात असलेले वजन आणि स्थूलता हा आजार झाल्यास शास्त्रीय उपचार याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे .
नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील स्थूलता आणि बेरियाट्रिक तज्ज्ञ डॉ. परमेश्वर बंबरुळे म्हणाले की स्थूलता असणाऱ्या लोकांमध्ये झपाट्याने वाढ होत असून ही गंभीर बाब आहे.लठ्ठपणावर उपचार न केल्यास मधुमेह,उच्च रक्तदाब,हृदयरोग,चयापचयाचे विकार आणि इतर अनेक गुंतागुंत होऊ शकतात. तब्बल २३० समस्या निर्माण होण्यास स्थूलता जोखिमकारक ठरू शकते.लवकर निदान आणि शास्त्रीय उपचार हे या गुंतागुंतींची जोखीम लक्षणीयरित्या कमी करू शकतात आणि जीवनमान उंचावू शकतात.
ते पुढे म्हणाले की जसे वय वाढत जाते तसे चयापचय प्रणाली मंदावते, स्नायूंमध्ये झीज / कमकुवतपणा सुरू होते . त्यामुळे आहार तोच असताना लठ्ठपणा का वाढत आहे असा अनेकांना प्रश्न पडतो. अजून एक कारण म्हणजे आपल्या आहारात कार्बोदक्युक्त पदार्थ जास्त आणि प्रथिनयुक्त पदार्थ कमी असतात. विशेष करून वयाच्या तिशीनंतर याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
स्थूलतेचे दोन पैलू असतात, एक म्हणजे वजन आणि दुसरे आणि जास्त जोखिमकारक म्हणजे पोटाचा घेर. हा आशियाई लोकसंखेमध्ये जास्त दिसून येतो.आहार आणि व्यायाम, सक्रिय जीवनशैली ह्याचे महत्व लोकांपर्यंत सतत पोहचवणे परिणामकारक ठरू शकते.
लठ्ठपणाला आता वैद्यकीय स्थिती म्हणून ओळख मिळाली आहे.लठ्ठपणाच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे. व्यायाम आणि आहाराच्या माध्यमातून नियंत्रण, पुढच्या टप्प्यात आजार असल्यास वैद्यकीय व्यवस्थापनाची गरज पडू शकते. यावर उपलब्ध असलेल्या प्रगत उपचारांद्वारे लवकर निदान आणि उपचार करत संबंधित गुंतागुंतीची जोखीम करणे शक्य आहे.वजन कमी करण्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.


