पुणे : आसामचा पारंपरिक नववर्ष सण ‘रोंगाली बिहू’ निमित्त पुण्यात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘असोमी’ या पुण्यातील आसामी समुदाय संघटनेतर्फे भारती विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या सहकार्याने ‘रोंगाली २०२६’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजल्यापासून एरंडवणे येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाच्या खुल्या मैदानात पार पडणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा.शारंगधर साठे यांनी दिली.
या उत्सवाच्या माध्यमातून आसाम आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या नववर्ष सणांचा एकत्रित जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षणांमध्ये आसाममधील आमंत्रित कलाकारांची सादरीकरणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या कलाकारांकडून सादर होणारे ऊर्जा भरलेले बिहू नृत्य, तसेच ‘कोनी जुज’ (अंड्यांची लढत) यांसारखे पारंपरिक आसामी खेळ यांचा समावेश आहे.
याशिवाय, शाकाहारी व मांसाहारी अशा विविध आसामी पदार्थांचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उपस्थितांसाठी उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


