Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedयशकथा :मुख्यमंत्री रोजगार योजनेतून स्वावलंबन; इतरांनाही दिली रोजगाराची संधी*

यशकथा :मुख्यमंत्री रोजगार योजनेतून स्वावलंबन; इतरांनाही दिली रोजगाराची संधी*

 

 

महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि सामाजिक समानता मिळवून देण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा महिला स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती फक्त स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तर कुटुंब आणि समाजालाही सकारात्मक दिशा देते. उद्योजकता महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देते. स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याने त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, नवीन कल्पना राबवू शकतात आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करू शकतात. शासनाच्या विविध योजना, बँकांचे कर्जसहाय्य आणि प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महिलांना उद्योग सुरू करणे अधिक सोपे झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकामुळे महिलांना भांडवल, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळते. या सहाय्यामुळे विविध महिला लघुउद्योग, सेवा व्यवसाय, हस्तकला, आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रांत यश मिळवत आहेत.

 

महिला उद्योजकता केवळ आर्थिक प्रगतीसाठीच नव्हे, तर सामाजिक बदलासाठीही महत्त्वाची आहे. जेव्हा एक महिला सक्षम होते, तेव्हा ती इतर महिलांसाठी प्रेरणा बनते आणि समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढतो. आजच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी उद्योजकता हा एक मजबूत पाया आहे. योग्य संधी, मार्गदर्शन आणि जिद्द असेल, तर प्रत्येक महिला यशस्वी उद्योजक बनू शकते. अशाच प्रकारचे पुणे जिल्ह्यातील तेजस्वी रामचंद्र कांबळे यांनी आरोग्य क्षेत्रात उद्योग उभा करून केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिला आहे.

 

श्रीमती कांबळे ह्या एक जिद्दी आणि मेहनती महिला उद्योजिका आहेत. त्या “ॲक्युप्रेसर थेरपी” व्यवसायात कार्यरत आहेत. कोविडसारख्या कठीण काळात जग अडचणींचा सामना करत असतानाही त्यांनी आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचा निर्धार केला. या काळात त्यांना जिल्हा उद्योग केंद्राचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती घेवून कर्ज मिळण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली. बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने त्यांना २६ लाख ५० हजार रुपयाचे कर्ज मंजूर झाले आहे. ज्यामध्ये २५ टक्के अनुदानाचा लाभ मिळाला. या आर्थिक सहाय्याच्या बळावर त्यांनी थर्मल अक्युप्रेशर यंत्रसामग्री उत्पादन व्यवसाय सुरू केला. त्यांच्या उत्पादनांमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित समस्या कमी करण्यास मदत होत असून, औषधांशिवाय उपचार देण्यावर त्यांचा भर आहे.

 

आज त्यांच्या उद्योगातून वार्षिक सुमारे ४० लाख रुपयाची उलाढाल होत असून होतकरु महिलांना रोजगाराच्या संधी मिळाली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे आणि अनेकांना नैसर्गिक उपचारांचा लाभ मिळत आहे. तेजस्वी कांबळे यांची ही यशोगाथा केवळ आर्थिक प्रगतीची नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि समाजसेवेची प्रेरणादायी कहाणी आहे. त्या इतर नवउद्योजक महिलांसाठी आदर्श ठरत असून शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी होण्याचा संदेश देत आहेत.

 

*श्रीमती अर्चना कोठारी, महावस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे:* सुशिक्षित बेरोजगार होतकरु युवक, युवतींसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या मार्गदर्शनाने व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय यांच्यामार्फत करण्यात येते. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून या योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून हे पोर्टल सुलभतेने कार्यान्वित झालेले आहे. या योजनेचा अधिकाधिक युवक-युवतींनी लाभ घ्यावा.

 

*श्रीमती तेजस्वी कांबळे:* मी उत्पादित करीत असलेली उत्पादने ही ग्राहकांच्या हिताची आणि आरोग्याशी निगडीत असल्याने त्यातून मिळणारे समाधान मला अधिक उर्जा देते. आधुनिक मशीनद्वारे पाठीच्या मणक्यावर इलाज करते आणि त्यातून त्रस्त रुग्णांना वेदना मुक्त करण्याचे काम करते. कोणत्याही पद्धतीची गोळ्या औषधे न देता आजारांच्या मुळाशी उपचार दिल्यामुळे लोकांना दीर्घकाळ निरोगी राहण्यास मद्दत होते. व्यवसाय वृद्धींगत करण्यास जिल्हा उद्योग केंद्राचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

*संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments