Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुस्तक परिचय* "असो चैतको मयना"...

पुस्तक परिचय* “असो चैतको मयना” : ‘कलाली’ चा गोडवा

 

 

वयाची पंच्याहत्तरी आणि पंच्याहत्तरच कविता असा

‘असो चैतको मयना ‘ या कविवर्य प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘कलाली’ बोलीतील पहिला कविता संग्रह आहे.

 

कवी प्राचार्य डॉ. रामदास चवरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून अध्ययन, अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाय ललित, काव्य, कथा, कादंबरी, समिक्षा, वैचारिक लेखन, संशोधन, शब्दकोश व संपदा अशी साहित्य निर्मिती त्यांच्याकडून झाली आहे.

 

विशेष म्हणजे लुप्तप्राय होत चाललेल्या बोली भाषेचा जीवनदायी दस्तावेज अथवा भाषिक वारशाचे जतन करणारा ‘कलाली मराठी’ शब्दकोश त्यांनी निर्माण केला आहे.

 

भारतामध्ये पूर्वेकडे हिंदी भाषेचा अधिक प्रभाव आहे. दक्षिण भारतात कानडी, तेलुगू, मल्ल्याळम आदी भाषा व त्या त्या राज्याच्या विविध बोली आहेत. तसेच मध्य भारतात विशेषतः मध्य प्रदेशात हिंदी भाषेचा अधिक वापर केला जातो. महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी भाषा बोलली जाते. मात्र वेगवेगळ्या भागात विविध बोलींचाही वापर होत असतो. पूर्व विदर्भात जसे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये मराठी बोलली जात असली तरी ती हिंदी मिश्रीत असते. पूर्व विदर्भाला मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशची सीमा लागून असल्यामुळे बोलताना मराठीत काही हिंदी शब्द

आपसूकच येतात.

 

भंडारा, गोंदियात जिल्ह्यांमध्ये कलाली बोली बोलणाऱ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी अस्तंगत होत चाललेल्या कलाली बोलीच्या कविता संग्रहाच्या माध्यमातून कलाली बोलीला पुन्हा जीवंत केले आहे. बारकाईने अभ्यास किंवा निरीक्षण केले तर कलाली बोली फार अवघड न वाटता सहज समजू शकेल, असे या बोलीतील शब्द आहेत. आपल्या बोलीचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा, व्यवहारात तिचा वापर वाढावा, समूह गटाचे मेळावे आयोजित करावे किंवा सभा संमेलनाचे आयोजन करून बोलीचे संवर्धन करावे, असे विचारमंथन सुरू असते असे या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी म्हटले असून ते बरोबरही आहे.

 

कवी डॉ. रामदास चवरे हे कलाली बोलीचे जाणकार अभ्यासक आहेत. कलाली बोलीचे शब्द सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य त्यांच्यातील कवीला भूरळ पाडून गेले. त्यातूनच ‘असो चैतको मयना ‘ हा कलाली बोलीतील पहिला आधुनिक कविता संग्रह उदयास आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अहिराणी बोलीत कविता रचून ती अजरामर केली. तशी डॉ. चवरे यांनी कलाली बोलीत कवितांची निर्मिती करून ही बोली अजरामर केली.

 

 

 

‘ भारत माता महान ‘ या कवितेतून भारतभूमीची थोरवी गाताना कवी म्हणतात ,

“कोटी कोटी कंठ,

खुशिसे करे नीती गुणगान

दुनियामे हमारी

भारत माता महान

गंगा, यमुना नित्य हमारी

जीवनदायिनी सरिता

काश्मीरचे कन्याकुमारी

जनमनकी एकता

संत, महंत, प्रज्ञावंत भूमिके भूषण

राष्ट्रनिष्ठा रहोय हमारी

आण, बाण अन् शान…”

 

कलाली भाषेची थोरवी गाताना कवी म्हणतात,

“माय कलाली भाषा आपली

झुळझुळती ममता

मन प्रसन्न होत खुशीसे

ओको थोरवी गाता…”

 

मराठी पंचांगानुसार चैत्र हा वर्षातला पहिला महिना तर इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना साधारण मार्च आणि एप्रिल महिन्यात येतो. या महिन्यात वसंत ऋतू बहरतो. झाडांना नवीन पालवी फुटते. गुलमोहर आणि बहावा फुलतो. तसेच फळांचा राजा आंबा मोहरण्यास सुरवात होते. त्याचप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा येतो. मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. या महिन्याचे महत्त्व लक्षात घेता कवीने ‘असो चैतका मयना’ असे नाव त्यांच्या कविता संग्रहास दिले असावे आणि त्यातूनच या कवितांची निर्मिती झाली असे म्हणावयास हरकत नाही.

कवी म्हणतात,

“पिपरके शेंडापर

पान इवलोसे डोले

उन्हाराने दिनभर

मार तपनको झेले

गाय हंबरे कोठाने

आखो वासरू दिखेना

दोही आँखोनेको पाणी

ओको बोवनो थांबेना

असो चैतको मयना

नदीनालाभी

कोळले पाखरूखे

नाहाय पाणी

कारी धरणीभी उरे

किती कळक तपन

कसे राबत मजूर

पोटपीठ एक होय

अन् नाहाय पोटभर…”

 

कवीने ‘एक गाव’ या कवितेत गावाचे वर्णन केले आहे.

सर्व जण एकत्र राहतात, जेवतात. त्यांची सुख दुःखे मात्र सगळ्यांची एकच असतात.

“मिने एक गाव देख्यो

जो हू वहाॅं काम करे

कोई नहाय शिक्यो तरी

समृद्धी वहाॅं राज करे

संगमंगने राहोत

घरे सोबत जेवत

एकके सुखदुख

यहाँ सबको होवोत…”

एक गाव हीच एक संस्कृती असते. सुख, दु:ख, जात, धर्म, ना मस्जिद ना देऊळ, ना कुणी मुखिया. भारतीय संविधानामुळे जातपात, भेदभावाचे समूळच नष्ट झालेले आहे. गावात समजूतदारपणा असते. त्यामुळे तेथे सुख दुःखाच्या काळात सर्व एकत्र येतात, ते वाटून घेतात. यातच मानवी संस्कृतीचे अस्तीत्व दडलेले आहे.

 

‘तू रावण नोको होऊ’ या कवितेत कवीने माणसातील मनुष्यत्वाला आवाहन केल्याचे दिसून येते.

“किती समजाऊ तोखे

नोको अशी माती खाऊ

तोरे घरे नांदे सीता

तू रावण नको होऊ…”

तुझ्या घरीच सीता नांदते आहे, त्यामुळे तू रावण बनू नको, अशाप्रकारचे शहाणपण माणसाजवळ आल्याशिवाय समाजाचे चित्र बदलणार नाही. म्हणूनच ‘ अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस ‘ असा प्रश्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी उपस्थित केला. तोच प्रश्न कदाचित कवी डॉ. चवरे यांना पडला आहे.

 

आज दुर्दैवाने शिकली सवरलेली माणसे देखील बुवाबाजी, अंधश्रद्धेत गुंतलेली दिसत आहेत. नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणात हेच चित्र दिसून आले. शिक्षित माणसाने, समाजाने चांगले काही स्वीकारले पाहिजे, असे कवीला वाटते. ते म्हणतात

“शिके सवरे माणसा

तोरी अजब दुनिया

बुवाबाजी चले यहाँ

बुद्धी तोरी गयी कहाॅं…”

भोंदू बाबा आणि त्याच्या कारनाम्याला बळी पडणारे पुरुष आणि महिला उघडे डोळे ठेवून पाहत नसतील तर समाज कुठे चालला आहे, यावर विचारमंथन करण्याची गरज आहे. कवीला देखील हेच अपेक्षित असावे.

 

कवी डॉ. रामदास चवरे यांनी या कवितासंग्रहामध्ये निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, आर्थिक, कला, साहित्य असे जवळपास सर्वच विषय हाताळले आहेत. जीवनाची अनेक रूपे आहेत. ‘जिंदगी के रूप’ या कवितेत कवीने

“जपे गुलाब खुशीसे

काटा संगणे पराग

उसे मरेखे सारखे

तोरे राग अनुराग

जसी तपन बारीस

दोही नीत आत जात

काल सुख की बरात

आज दुख की खैरात…”

 

‘जिंदगी के रूप’ ही कविता एक उत्कृष्ट गीत आहे. गझल गंधर्व श्री. सुधाकर कदम यांनी ते संगीतबद्ध केले तर ते सुप्रसिद्ध गायिका प्राजक्ता सावरकर यांनी सुरेल आवाजात गायिले आहे. गीताला जाणकार रसिकांनी भरभरून दाद दिली.

 

शेतकरी हा साधासुधा माणूस आहे. तो शेतात राबराब राबतो,स्वतः अर्धपोटी राहतो पण सगळ्यांना खायला अन्न पुरवतो. म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. कवीने या शेतकऱ्याची तसेच बिबा आणि कडू कारल्याची महती देखील ‘ सादो सुदो माणूस ‘ या कवितेतून विषद केली.

“नाव बिबाके ठेवत

बिबा बळो गुणकारी

होय अंग की जखम

बिबा भरणेसे बरी

कळू कहोत करेला

ओके गुण अनगीन

नायनाट करे सब

रोग आंग के दारुण

सधोसुदो खेतकरी

किती सोशिक रहयो

सोता अर्ध पोट

तरी सब दुनिया पोसत…”

 

मातीचे महत्त्व सांगताना,

‘ सब सिमीट को बन’ या कवितेत कवी म्हणतो,

“सुख येको होय

माणूस उभारणे उळे

दुःख एक होय

हू मातीको नाता तोळे

माती मायकोच रुप

अनपानी उपजाये

माय उपासी तापासी

कभी मातीपर सोये

सिमीटके जंगलने

मातीसाठी झुरे मन

जिते देखो उते हय

सब सिमीट के बन…

 

माणसाने मातीशी नाते तोडले. मात्र माती हे मायचे रुप आहे, त्याच मातीतून अन्नधान्य तयार होते. माय उपासीतापासी असली तरी ती मातीवर झोपते. सिमिटाच्या जंगलांमुळे मातीसाठी मन झुरते. जिकडे पाहावे तिकडे सिमेंटचेच जंगल झाले, अशा भावना कवीने या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.

 

दुसऱ्या एका कवितेत आईची महती कविने विषद केली.

‘ माय फक्त माय हय’ या कवितेत कविने मायची लीला अधोरेखित केली आहे. साने गुरुजींनी देखील आईची महती गायली आहे. मायसारखं व्यक्तीमत्व या जगात कुणीच नाही, असे म्हणत कवी डॉ. चवरे यांनी आईप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

“माय रोज पहेटखे

करी एकटी झाळलोट

हम सब सोये सोये

देखो ओकी पायपीट

माय बळे हरिखसे

सळासारवन करे

ओके चेहराबी खुसी

आमोरा दुख सारे

सबखे दे चहापाणी

सोता कभेच पिकेना

हम सब जेये बिना

घास अनको लेयेना…

 

या कविता संग्रहास मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावतीचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी आपल्या भाषा, साहित्यविषयक अनुभवातून प्रस्तावना लिहून मांडणी केली, ती वाखाणण्यासारखी आहे. संयम, संवेदनशीलता, अरूपाक्षरत्व हे या कविता संग्रहाचे स्पृहणीय विशेष ठरावेत.

 

कलाली भाषेचा मराठी शब्दकोष तयार करताना ‘असो चैतका मयना’ या कविता संग्रहाची कवी डॉ. रामदास चवरे यांच्या मनात निर्मिती होत होती, असे त्यांनी त्यांच्या मनोगतात नमूद केले आहे. एवढेच नाही; तर कलाली बोली बोलणाऱ्या कलाल समाजातील लोकांच्या व्यथा, दुःख, दैन्य, त्यांची परिस्थिती कवीने मांडली. कलाली बोलीतील हा एक कायमचा दस्तावेज तयार झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

प्रकाशन व्यवसायात मुरत चाललेल्या आणि धाडसाने पावले टाकणाऱ्या शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातून संचालक पदावरून निवृत्त झालेल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ या प्रकाशन संस्थेचे प्रमुख व संपादक देवेंद्र भुजबळ यांनी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पेलत तो प्रकाशनाच्या माध्यमातून वाचक, रसिकांच्या स्वाधीन केला आहे.

 

बोलीची उत्सुकता आणि त्यातील शब्दांची गोडी वाचताना हा कविता संग्रह प्रत्येकाला निश्चितच आनंद देऊन जाईल, याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. कलाली बोलीतील अशाप्रकारचा ‘असो चैतका मयना ‘ हा पहिलाच कविता संग्रह असल्यामुळे त्याला वाचक रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.

या पुस्तकाची किंमत २५० रुपयेच इतकी वाजवी असल्याने तो सहज विकत घेऊन वाचता येईल आणि मनी आनंदही मिळवता येईल, असे वाटते.

– शेषराव वानखेडे

ज्येष्ठ पत्रकार.

9869484800.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments