पुणे, दि. १९ : कृषी विभागाकडून खरीप हंगामातील कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर तूर व मूग पिकाचे ०.२० हेक्टर क्षेत्रासाठी ४ किलो बियाणे वाटप केले जाणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांच्यावतीने करण्यात आले आहे.
पुणे विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी १४ हजार ३०० कीट वितरणाचे लक्षांक असून ५ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी १ हजार कीटच्या लक्षांकापैकी ५१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ७ हजार ३०० लक्षांकापैकी ३ हजार ९३४ तर सोलापूर जिल्ह्यासाठी ६ हजार पैकी १ हजार २३३ अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे या योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे, अहिल्यानगर व सोलापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
0000


