Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

 

 

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन

 

 

 

मुंबई,दि : राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हवामानातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्यासारख्या घटना या निसर्गाच्या बदललेल्या चक्राचा भाग आहेत. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने पूर्वतयारी केली असली तरी काही वेळा अपेक्षेपेक्षा वेगळ्या घटना घडतात. मात्र अशा प्रत्येक परिस्थितीत महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित सर्व विभाग रस्त्यावर उतरून तातडीने मदतकार्य करत आहेत.

 

 

 

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

 

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी त्वरित वाहतूक वळविणे, रस्ते बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणे तसेच पाण्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

मुख्यमंत्री यांनी सांगितले की, संभाव्य धोका लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांत धोकादायक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून दुपारनंतर राज्यातील काही भागांत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, शक्यतो प्रवास टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक बाहेर पडू नये.

 

विशेषतः तरुणांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

 

मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नियमित आढावा घेतला जात आहे. सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी यंत्रणेत कमतरता राहणार नाही आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

तसेच, गेल्या दोन-तीन दिवसांतील घटनांबाबत, करण्यात आलेल्या मदतकार्याबाबत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर निवेदन उद्या सादर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले

.

 

000

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments