Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedजलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा - ...

जलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड · २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’

मुंबई, दि. १९ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील वरळी प्रोमेनेड येथे तर सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय ठिकाणी होणार आहे. राज्यभर होत असलेल्या या जलसंधारण लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी निर्धार करुया आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश सर्वत्र पोहचवूया, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, कलाकार, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हे केवळ तीन किलोमीटर चालणे नसून, महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी उचललेली चार हजार पावले ठरणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना ३ किलोमीटरचे अंतर चालायचे आहे. साधारणपणे ३ किलोमीटर अंतर म्हणजे जवळपास ४ हजार पावलांचा प्रवास होतो. त्यामुळे ‘४ हजार पावले पाण्यासाठी’ हा संदेश या अभियानाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संधारण, पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे, मातीची धूप रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर प्रत्येक ‍जिल्ह्यामध्ये प्रायोजकाच्या माध्यमातून एकूण ७१,००० रुपये रक्कमेची रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे, तसेच प्रत्यक्ष सहभागींच्‍या मधून ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

महा वॉकेथॉन हा व्यापक जलसंधारण अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या कालावधीत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments