*
पुणे, दि. २१ : माती आणि पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा-वॉकेथॉन- रन फॉर वॉटर २०२६ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंडपासून सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी-कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जल व्यवस्थापन, स्वच्छता समितीच्या सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर,
जिल्हा समाजकल्याण अधिकारी
राधाकिसन देवढे, प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी, अधीक्षक अभियंता सुहास गायकवाड, कार्यकारी अभियंता गौरव बोरकर , कार्यकारी अभियंता दिपक लांडगे,अधिक्षक अभियंता गुण नियंत्रण सुहास गायकवाड, उप अभियंता सागर भोर, सुयश महाडीक, ज्ञानेश्वर उभे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘माती आणि पाणी वाचवा, भविष्यातील पिढी सुरक्षित करा’ हा संदेश देत सकाळी सहा वाजता वॉकेथॉनला सुरुवात झाली. सहभागींच्या सुरक्षिततेसाठी मार्गावर पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि आवश्यक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नोंदणीकृत सहभागींसाठी टी-शर्ट, सहभाग चिन्ह तसेच कार्यक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध वयोगटांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
*’माती-पाणी संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी’- अभिनेत्री भार्गवी चिरमुले*
अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाल्या, माती आणि पाणी संवर्धन ही केवळ शासनाची किंवा एखाद्या विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आधीच्या पिढ्यांनी माती आणि पाणी जपले म्हणून आज आपल्याला हिरवळ आणि निसर्ग अनुभवता येत आहे. पुढील पिढ्यांनाही हेच सुंदर पर्यावरण मिळावे यासाठी आपल्या पिढीने ठोस काम करण्याची गरज आहे.
आजची वॉकेथॉन केवळ चालण्यापुरती मर्यादित नसून जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडिया आणि रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविता येऊ शकतो. त्यामुळे जलसंधारण विभागाने अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कलाकार म्हणून आमची जबाबदारी केवळ कला आणि संस्कृतीपुरती मर्यादित नाही. समाजाचे देणे लागते, या भावनेतून प्लास्टिकमुक्ती, झिरो वेस्ट आणि पर्यावरण संवर्धनासारख्या उपक्रमांमध्येही कलाकारांनी सहभागी झाले पाहिजे. जलसंधारणासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाला कलाकार म्हणून शक्य ती मदत करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असेही भार्गवी चिरमुले यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना जलसंधारण विभागाचे अभियंता गौरव बोरकर म्हणाले, जलसंधारण विभागामार्फत माती आणि पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया आणि रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
माती आणि पाणी वाचविले तरच पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसंधारणाच्या या लोकचळवळीत सहभागी होऊन माती व पाणी संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वयंसेवी संस्थांचा विशेष सत्कार
वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचाही विशेष सत्कार करण्यात आला. जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. माती व पाणी संवर्धनाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्थांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
*स्वयंसेवी संस्थांचा सहभाग; सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथकांची व्यवस्था*
सहभागींच्या आरोग्याच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी वैद्यकीय पथके, प्रथमोपचार साहित्य, औषधे आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. उष्माघात, चक्कर येणे, दुखापत, रक्तदाब आदी संभाव्य बाबींसाठी आवश्यक प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली.
*असा होता वॉकेथॉनचा मार्ग*
पोलीस मुख्यालय मैदान, शिवाजीनगर येथून सुरू झालेली वॉकेथॉन संचेती हॉस्पिटल चौक, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालय मैदान येथे पोहोचली.
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘पाणी वाचवा, माती वाचवा, भवितव्य वाचवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक झाला.
यावेळी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मृद व जलसंधारणाची शपथ घेतल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वॉकेथॉनला ‘फ्लॅग ऑफ’ करण्यात आला. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी तर ऋतुजा ढगे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


