पुणे : पुण्याच्या साडेतीनशे वर्षांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वाटचालीचा साक्षीदार असलेल्या श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरास पेशवेकाळापासून दिवाबत्तीसाठी देवदेवेश्वर संस्थानकडून मिळणारा वर्षासनाचा मान काही काळाच्या व्यत्ययानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. मंदिराच्या इतिहासावरील संशोधनातून वर्षासनाचे पुरावे समोर आल्यानंतर देवदेवेश्वर संस्थान आणि श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या नोंदींची खातरजमा करून हा ऐतिहासिक मान पुन्हा बहाल करण्यात आला.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सप्ताहाचा प्रारंभ झाला. यावेळी श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरास मिळणारा वर्षासनाचा मान पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा रमेश भागवत यांनी केली.
या समारंभास पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, पुणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर बरकाले, ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, पाचसोड्या विठोबा देवस्थानचे विश्वस्त रविंद्र फटाले, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, प्रसाद माने, नागनाथ पार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रितेश केदारी, सेवा मित्र मंडळाचे खजिनदार अमर लांडे, लायन्स क्लब पुणे सिटीचे उपाध्यक्ष दिलीप थोरात, खजिनदार बजरंग आकडे, जय मातादी सेवा संघाचे संस्थापक शिवाजी चव्हाण, ट्रस्टचे कर्मचारी तसेच महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने कोषाध्यक्ष दीपक थोरात यांनी देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत आणि पुणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर बरकाले यांचे आभार मानले. यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दीपक थोरात म्हणाले, पुण्याच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींचे श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर साक्षीदार आहे. पुण्याच्या सुख-दुःखात तसेच विविध संकटांच्या काळात गेली साडेतीनशे वर्षे हे मंदिर पुण्याच्या मागे समर्थपणे उभे आहे. पानिपतच्या युद्धापासून रँडच्या वधापर्यंत, विदेशी कपड्यांच्या होळीपासून अनेक सामाजिक व ऐतिहासिक घटनांपर्यंत मंदिराने पुण्याचा इतिहास जवळून पाहिला आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या प्रभात सिनेमा तसेच अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे मंदिर परिसरात चित्रीकरण झाले आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी मंदिरात अनेक वेळा रियाज केला असून, त्यांच्या रियाजातून अनेक प्रसिद्ध गाणी आकाराला आली. संत कलावती माता यांचे प्रथम प्रवचनही याच मंदिरात झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्राच्या वाटचालीचेही महत्त्वाचे केंद्र राहिले आहे.
पेशवाईच्या काळात पुण्यातील अनेक मंदिरांना दिवाबत्तीसाठी देवदेवेश्वर संस्थानकडून वर्षासन दिले जात होते. त्याचप्रमाणे श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरालाही वर्षासन मिळत असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. कालांतराने अनावधानाने या वर्षासनाच्या मानामध्ये काही काळ व्यत्यय आला होता.
दरम्यान, लेखक मंगेश चव्हाण यांनी श्री लकडी पूल विठ्ठल मंदिराच्या इतिहासावर लिहिलेल्या कथा एक मंदिराची या पुस्तकातून मंदिराच्या वर्षासनासंदर्भातील महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले. पुस्तकातील नोंदी तसेच श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि देवदेवेश्वर पर्वती संस्थान यांच्या नोंदींची एकमेकांशी खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वर्षासनाचा हा ऐतिहासिक मान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


